मुंबई : भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास राज्य सरकारकडून काढून घेत केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या NIA कडे देण्यात आला. राज्य शासनाने केंद्राच्या या भुमिकेवर टीकेची झोड उठवली. दरम्यान भीमा कोरेगाव प्रकरणी तपास करण्यासाठी NIA ची टीम आज पुण्यात आली होती. पुणे पोलिसांकडून काही कागदपत्र घेऊन ही टीम पुन्हा परतली.


न्यायालयात दाद मागणार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एल्गार परिषदेला नक्षलवादाशी जोडण्यात अर्थ नाही असं एल्गार परिषदेचे आयोजक बी जी कोळसे पाटील यांनी म्हटले आहे. तत्कालीन सरकारनं केलेला कोरगाव भीमाचा तपास १०० टक्के खोटा आहे असंही ते म्हणालेयत. भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास NIA कडे दिल्याविरोधात एल्गार परिषदेचे आयोजक न्यायालयात दाद मागणार आहेत.



पवारांचा हल्लाबोल


कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणातील सत्य बाहेर येण्याच्या भीतीपोटीच केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास राज्याकडून काढून 'एनआयए'कडे दिला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या तपासासंदर्भात पोलिसांनी तारतम्य बाळगलेले नाही. त्यामुळे तपास होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.


कृती राज्यघटनेच्या विरोधात


राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही केंद्राच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. विशेष तपास पथकाकडून (SIT) कोरेगाव-भीमा प्रकरणाची सखोल चौकशी झाली असती. केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करून राज्य सरकारची कोणतीही परवानगी न घेता हा तपास एनआयएकडे सोपविला. ही कृती राज्यघटनेच्या विरोधात आहे. काही जणांना वाचवण्यासाठीच केंद्राने हा तपास 'एनआयए'कडे दिल्याचा देशमुख यांनी केला होता.