IMD Red Alert: मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  मुंबई आणि रायगडमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसंच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.  पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी ही हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा कोल्हापूर परिसरातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


मुसळधार पावसाचा मुंबईकरांना फटका बसला आहे. ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल 30 ते 40 मिनिटं उशिरा धावतायत. .मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीय. लोकल रखडल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप  सहन करावा लागत आहे. 


मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका हार्बर मार्गाला बसलाय. वाशी ते सीएसएमटी सेवा ठप्प झाली. सकाळी 9.30 नंतर हार्बर लाईनच्या चुनाभट्टी स्थानकावर मिठी नदीच्या पाण्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली. वडाळा रोड ते मानखुर्दपर्यंत एकही सेवा चालवली जात नव्हती. पाणी ओसरल्यानंतर हार्बर लोकल  पुन्हा सुरळीत करण्यात आली. 


मुंबई मध्ये मुसळधार पावसामुळे कल्याण रेल्वे स्थानकात प्रवशांची गर्दी झालीय. मुंबई आणि उपनगरात काल मध्यरात्री पासून मुसळधार पावसामुळे सायन, कुर्ला, माटुंगा रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलंय. मध्य आणि हार्बरलाईन रेल्वे सेवा विस्कळीत झालीय. ठाण्यापासून मुंबईकडे जणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल आणि एक्सप्रेस रद्द झाल्यात. रेल्वे लाईन विस्कळीत झाल्याने कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची व चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती.