पुणे : PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभ आता लाभार्थींच्या आधार लिंक बँक खात्यावर लाभ जमा होणार आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना फेब्रुवारी 2019मध्ये सुरू झाली. या योजनेमध्ये पात्र शेतकरी कुटुंबाला प्रत्येक चार महिन्याला रुपये 2000 प्रमाणे वार्षिक रुपये  6000 रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून दिला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी eKYC ची अंतिम मुदत वाढवली आहे. पीएम किसान पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटच्या अधिसूचनेनुसार, शेतकरी आता 31 मे 2022 पर्यंत त्यांचे eKYC करू शकतात. यापूर्वी ते 31 मार्च ते 22 मे 2022 पर्यंत वाढवण्यात आली होती.


या योजनेत महाराष्ट्र राज्यात 1,09,33,298 शेतकरी खातेदार  लाभार्थी असून त्यापैकी 1,06,53,329/- खातेदारांची आधार कार्ड नुसार माहिती प्रमाणित करण्यात आली आहे. अद्यापही सुमारे 2.79 लाख लाभार्थ्यांचे आधार दिले नाही किंवा त्यांनी दिलेला आधार क्रमांक मध्ये त्रुटी असल्याने ते प्रमाणित होऊ शकले नाहीत. या योजनेअंतर्गत मार्च 2022 अखेर रुपये 2000 प्रमाणे आतापर्यंत 10 हप्ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.


मात्र एप्रिल 2022 ते जुलै 2022 या कालावधीतील लाभाची रक्कम आणि या पुढील लाभाची प्रत्येक रक्कम ही लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्याचा  निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील 1,06,53,329 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीत झाले असून त्यापैकी 88,74,872 लाभार्थ्यांचे आधार त्यांच्या बँक खात्याशी लिंक आहेत.मात्र उर्वरित 17,78,283 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण जरी झाले असले तरी त्यांचे आधार त्यांनी बँक खात्याला लिंक केलेले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे. तात्काळ आपल्या संबंधित बँकेत जाऊन आपले बँक खाते हे आधार संलग्न लाभ मिळण्यासाठी अधिकृत करून घ्यावे. जेणेकरून त्यांना मिळणार्‍या लाभाची रक्कम ही त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.


ज्या लाभार्थ्यांनी योजनेत नोंदणी करताना आधार क्रमांक दिला नाही किंवा त्यांच्या आधार क्रमांकामध्ये काही त्रुटी आहेत अशा लाभार्थींनी तात्काळ संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या आधार तपशीलातील त्रुटी दूर करून घ्याव्यात व आपले आधार आपल्या बँक खात्याशी संलग्न करून घ्यावे. जेणेकरून त्यांनाही या योजनेअंतर्गत लाभ त्यांच्या बँक खात्यावर जमा होईल.