Maharashtra Politics: महाराष्ट्रात काका-पुतण्यातील वादानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. गेल्यावर्षी शिवसेनेत बंड झाल्यानंतर ही दुसरी धक्कादायक घटना राज्याच्या राजकारणात घडली. प्रभावी विरोधी पक्षनेते अशी ओळख असलेले अजित पवार राष्ट्रवादी पक्षासह भाजप-शिवसेनेच्या सत्तेत वाटेकरी बनले आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर अनेक आमदारांना मंत्री होण्याचे वेध लागले आहेत. या सर्व घटनेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडीवर ज्याप्रकारे निशाणा साधण्यात आल्या त्यानंतर राजकीय प्रतिक्रिया आणि आरोप-प्रत्यारोपांचे पर्व थांबलेले नाही. आता मुख्यमंत्र्यांची उपयुक्तता संपली असून महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार असल्याची एकीकडे चर्चा आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातील संजय राऊत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सतत निशाणा साधत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेतेही भाजपवर हल्लाबोल करत आहेत. आता नितीन गडकरींनी महाराष्ट्रातील घडामोडींवर आपल्या स्टाईलमध्ये भाष्य केले आहे. 


काय म्हणाले गडकरी?


आमदारांची गर्दी खूप वाढल्याने मंत्री होण्यासाठी इच्छुक असलेले सर्वजण आता नाराज असल्याचे नितीन गडकरी यांनी विनोदी स्वरात सांगितले. मंत्री होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या आमदारांना त्यांच्या शिवलेल्या सूट्सचे काय होईल हे माहित नाही, असेही ते हसत म्हणाले. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते महाराष्ट्रातील आमदारांच्या असंतोषावर ते बोलत होते.


'आमदारांनी शिवलेल्या सूट्सचे काय होणार'


'समाधान असेल तर सर्व काही ठीक आहे. आपल्या पात्रतेपेक्षा आपल्याला जास्त मिळाले आहे, असे एखाद्याला वाटत असेल तर तो समाधानी आणि आनंदी राहू शकतो. आमदार झालो नाही म्हणून नगरसेवक नाराज आहेत, मंत्री झालो नाही म्हणून आमदार नाराज आहेत आणि चांगले मंत्रिपद न मिळाल्याने मंत्रीही नाराज आहेत, असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले.


जे मंत्री होणार होते त्यांची अवस्था समजू शकतो. तो नक्कीच नाखूष होऊन या गर्दीत माझा नंबर कधी येईल का? असा प्रश्न विचारत असतील. ते आमदार सूट शिवून ते शपथविधीसाठी सज्ज झाले. आता उमेदवारांची गर्दी असल्याने त्या सूटचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला असल्याची मिश्किल टिप्पणी गडकरींनी केली. 


सभागृहात क्षमतेपेक्षा जास्त लोक बसू शकतात, पण मंत्रालयाचा आकार वाढवता येत नाही, असेही ते पुढे म्हणाले.