सोलापूर : Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात येत्या दोन ते दोन दिवसात भाजपचे सरकार येईल, असा दावा भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. त्याचवेळी ते म्हणाले, श्री विठ्ठल रुक्मिणी यांची आषाढीची महापूजा देवेंद्र फडणवीस करतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे 10 ते 12 खासदार सोबत येतील, असा गौप्यस्फोट प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे आज श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन करण्यासाठी पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले आहे.


महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. नवं सरकार येणार की नाही आले तर कधी येईल, अशी चर्चा सुरु असतानाच. भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मोठी माहिती दिली आहे. येत्या दोन तीन दिवसात राज्यात भाजपचे सरकार येईल. शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि सोबतचे बंडखोर आमदार यांच्या मदतीने भाजप सत्तेत येईल. त्यांच्यासोबत शिवसेनेचे 10 ते 12 खासदार सोबत येतील, असेही ते म्हणाले.


राज्यात कोण इशारे देत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावे. बंडखोर आमदारांच्या केसालाही धक्का लागणार नाही, असा इशारा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिला आहे. यंदाची आषाढी एकादशी महापूजा कोण करणार याबाबत सुद्धा चर्चा सुरु असताना देवेंद्र फडणवीस हेच महापूजा करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.