ठाणे : भिवंडी - ठाणे बायपास रस्त्यावर सकाळी १० वाजल्याच्या सुमारास कार व टीएमटी बसमध्ये भीषण अपघात झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघातत चार जणांचा जागेवरच मृत्यु झाला तर दोन गंभीर जखमी आहेत. जखमींना मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.  


मंगळवारी सकाळी दिवे गावाच्या परिसरात भिवंडीकडून मुंबईच्या दिशेने भरधाव निघालेली होंडा सिटी कार क्रमांक  MH -04 -AL-2742 या कारचा टायर फुटला... आणि ड्रायव्हरचा कारवरचा ताबा सुटून कारनं रस्ता द्विभाजक ओलांडून विरुध्द दिशेने येणाऱ्या ठाणे - अलिमघर या टीएमटी क्रमांक MH - 04 - G - 8002 या बसला जोरदार धडक दिली.


या अपघातात कारचा चेंदामेंदा होऊन कारमधील चार जणांचा जागेवरच मृत्यु झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस व नारपोली वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढून मृतकांचे शव ठाणे जिल्हा रुग्णालयात रवाना केले. जखमी झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे.  


घटनास्थळी पोलीस उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नरेश मेघराजाणी यांनी भेट दिली. या घटनेचा सखोल तपास नारपोली पोलीस करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.