विशाल वैद्य, झी मीडिया, ठाणे : रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा सण दरवर्षी सावन पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला काही भेटवस्तू (Raksha Bandhan Gifts) देतो. त्याचबरोबर बहिणीने भावाच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा (Raksha Bandhan Wishes) दिल्या जातात. यावेळी पौर्णिमा 30 ऑगस्टला सुरू होत आहे आणि ती 31 ऑगस्टच्या सकाळी समाप्त होत आहे. मात्र यावेळी भद्रा (bhadra) कालावधी पौर्णिमेपासून सुरू होत आहे. त्यामुळे यावेळी 30 च्या रात्री आणि 31 ऑगस्टला सकाळी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. अशातच रक्षाबंधनाचा सण बुधवार 30 ऑगस्टलाच दिवसभर साजरा करायचा आहे. या दिवशी भद्राकाल असल्याने राखी बांधली तर वाईट होईल. अशा अफवा पसरल्या आहेत. त्यात काहीही तथ्य नाही, असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण (Da Kru Soman) यांनी स्पष्ट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'रक्षाबंधनच्या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधते. जर मंत्रोपचार, पूजा, धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तर तो भद्रा करण असताना केला जात नाही. त्या दिवशी सकाळी 10:58 ते रात्री 9:02 भद्रा करण आहे. महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा तसेच धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. त्यामुळे संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधली तरी चालेल. भद्राकालात राखी बांधली तर वाईट होईल असा मॅसेज व्हायरल होत आहे. त्यात काहीही तथ्य नाही,' अशी माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी दिली आहे.


तसेच रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा बुधवार 30 ऑगस्ट रोजीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. "रक्षाबंधन विधीवत पूजा (Raksha Bandhan Puja Vidhi) करून मंत्रोच्चाराने साजरी करायची असेल तर रेशमी वस्त्रात अक्षता, सुवर्ण, दूर्वा, चंदन, केशर आणि सरसूचे दाणे घालून पोतडी करून ती बांधायची असते. हा विधी बुधवार 30 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी भद्रा संपल्यावर करायचा आहे. मात्र आपण जी राखी बांधतो त्याला भद्रा काल वर्ज्य नाही. आपण जो सण साजरा करतो तो सामाजिक आहे, कौटुंबिक आहे. त्याला भद्रा काल पहायची गरज नाही. या कौटुंबिक, सामाजिक सोहळ्याला वेळेचे बंधन नाही. त्यामुळे बुधवार 30 ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस रक्षाबंधन सोहळा साजरा करता येईल," असेही सोमण म्हणाले.