मुंबई : Maharashtra Political Crisis : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आणि शिंदे गटात 50 आमदार दाखल झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीची सरकार पायउतार झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचे सरकार स्थापन झाले. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला. त्यानंतर एक महिना होऊनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा होती. मात्र, आज मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता मावळली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी आहेत. त्यांना डॉक्टरांनी सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली. दरम्यान, काल तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले. त्यामुळे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरु झाली होती. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही दोन ते तीन दिवसात विस्तार होईल, असे संकेत दिले होते. त्यामुळे विस्ताराची शक्यता होती. 


देवेंद्र फडणवीस मध्यरात्री दिल्लीहून मुंबईला परतले. त्यांची दिल्लीत भाजप श्रेष्ठींसोबत बैठक झाल्याची माहिती दिली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. परंतु कधी विस्तार होणार याची माहिती भाजपकडून देण्यात आलेली नाही. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंची 50 आमदारांसोबत संध्याकाळी बैठक होत आहे. यावेळी आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांवर चर्चा होणार आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी ७ वाजता शिंदे समर्थक 50  आमदारांची महत्वाची बैठक होत आहे. त्यामुळे आज मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता मावळली आहे. मुख्यमंत्र्य़ांच्या बैठकीत शिंदे समर्थक आमदारांच्या मतदारासंघातील विविध विकास कामांसंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. तसेच संघटनात्मक बांधणीबाबतही चर्चा होणार आहे. या बैठकीचं ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. त्यातच मुख्यमंत्री आजारी आहेत.