Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. फक्त शरद पवार गट आणि अजित पवार गाट एकमेकांच्या विरोधात लढणार नाहीत तर ही ही लढत थेट पवार कुंटुबामध्ये होणार आहे. एकमेकांविरोधात लढत असले तरी शरद पवार गटाविरोधात भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार गट नाराज झाला आहे.  


नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवारांचा पराभव करणं हेच आमचं एकमेव ध्येय आहे. आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त महत्त्वाचा वाटतो असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. अजित पवार विरोधामुळे कौटुंबात एकाकी पडले असताना चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत येत शरद पवार यांच्यावर थेट टोकाची टीका केली. बारामती लोकसभेत मला आणि भाजप कार्यकर्त्यांना हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. तसंच शरद पवार यांचा पराभव करणं, आमचं एवढं एकच ध्येय आहे. आम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो आणि आता राष्ट्रवादीच्या चिन्हाला आम्ही पाठिंबा देणार आहोत. त्यामुळे लोक आमच्यावर टीका करतात. पण राजकारणात तराजू लावून निर्णय घ्यावे लागतात. सध्या आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त महत्त्वाचा वाटतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटलांच्या विधानावर अजित पवार गट नाराज झाला आहे. 


चंद्रकांत पाटील यांनी अशा प्रकारे जहरी टीका करत एक प्रकारे सहानभुती सुप्रिया सुळे यांना मिळवून दिली. चंद्रकांत पाटील यांनी विनाकारण पवार यावर टोकाची टीका टाळावयास हवी होती. भावनिक वातावरण अजित पवार यांच्या विरोधात जाण्यास कारणीभूत होत आहे असे मत एनसीपी अजित पवार गट नेत्यांनी व्यक्त केले आहे. 


मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज बारामतीमध्ये जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतलीय. बारामती लोकसभेतून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्याची बोललं जातंय. याच पार्श्वभूमीवर त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यामुळे बारामतीतून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांची भेट झाल्यानंतर चंद्रकांत पाटील महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीला हजेरी लावणार आहेत.