Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसी परीसरात असलेल्या अमुदान कंपनीत केमिकल रिअॅक्टरचा स्फोट होऊन आग लागली. यामध्ये अंबर केमिकल, ओमीगा केमिकल आणि के जी केमिकल कंपनी जळून खाक झाली आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत 48 जण जखमी तर 7 जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांसदर्भातील माहिती दिली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवलीत निवासी भागात MIDC आहे. त्यात धोकादायक केमिकल निर्मितीचे कारखाने आहेत. त्यांच्या स्थलांतराचा याबाबत निर्णय घेणं आवश्यक असल्याचं, शिंदे पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. 



डोंबिवली एमआयडीसी परिसरात कंपनी अगोदर आल्या मग वसाहत झाली, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान ब्लास्ट असणाऱ्या रासायनिक कंपन्यांना अंबरनाथमध्ये हलवण्यात येतील अशा निर्णय आम्ही घेतोय, असे मुख्यमंत्री म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील या चौघांची मिटींग झाली. यानंतर ते बोलत होते. 


डोंबिवली सोनार पाडा परिसरातील एमआयडीसी फेस नंबर दोन मधील  अंबर कंपनीतील बॉयलरचा  मोठा स्फोट झाला, या स्फोटाची तीव्रता  एवढी मोठी होती की त्याचा हादरा तीन ते चार किलोमीटर जाणवला, या कंपनीपासून 200 ते 300 मीटर अंतरावर असलेल्या रहिवासी क्षेत्रातील इमारतींच्या काचा फुटल्या तसेच व्यावसायिक इमारतींचही मोठं नुकसान झालं आहे.


काय म्हणाले श्रीकांत शिंदे?


या घटनेवर श्रीकांत शिंदे यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहोत. जखमींना आम्ही विविध रुग्णालयात दाखल केलं आहे. साधारण 30 ते 35 जण या घटनेत जखमी झाली आहे. अतिधोकादायक रसायनं तयार करणाऱ्या कंपन्या शहराच्या बाहेर नेल्या जाव्यात अशी मागणी स्थानिकांकडून केली जात असल्याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली. 


आम्ही यासंदर्भात पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी आम्ही चर्चा करुन याविषयीचा निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. येत्या 6 महिन्यांत इथल्या अतिधोकादायक केमिकल तयार करणाऱ्या कंपन्या शहराबाहेर कशा नेता येतील? यावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार असल्याची प्रतिक्रिया श्रीकांत शिंदेंनी दिली.