मुंबई : राज्यात सत्तासंघर्ष झाला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून एकनाथ शिंदे आणि भाजपने मिळून सरकार स्थानप करण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटाचे आमदार अखेर तब्बल 11 दिवसांनंतर मुंबईकडे रवाना झाले आहेत. थोडया वेळापूर्वी ते गोवा विमानतळावर दाखल झाले. शिंदे गटाचे सर्व आमदार रात्री 8च्या सुमारास मुंबईत दाखल होतील. 


शिंदे गटाचे आमदार आणि भाजपच्या आमदारांची आज संयुक्त बैठक होणार आहे. दरम्यान शिंदे गटाचे सर्व आमदार मुंबईत येणार असल्यानं मुंबई विमानतळावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 


दुसरीकडे बंडखोर आमदारांचा हॉटेल मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. दोन दिवसीय अधिवेशन संपल्यानंतरही बंडखोर आमदारांची लगेच सुटका होणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 


या बंडखोर आमदारांना मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरच आपआपल्या मतदारसंघात परतण्याची मुभा दिली जाणार आहे. बंडखोर आमदारांसह भाजप आमदारांचाही ताज प्रेसिडेंटमधील मुक्काम वाढवला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.