रत्नागिरी : तालुक्यातील भावेआडम गावातील गरिब कुटुंब अंधश्रदेचा बळी ठरलंय. अशिक्षितपणा आणि गरिबीचा फायदा घेत भोंदूबाबाकडून एका कुटुंबाची फसवणूक केलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भावेआडम गावातल्या एका कुटुंबाच्या गरिबीचा फायदा एका भोंदूबाबानं घेतला आणि घरातलं होतं नव्हतं तेवढं लुटून पोबारा केलाय. 


मृत्यूचं भय दाखवून शुद्धीकरणाच्या नावावर मुस्ताक काजी नावाच्या भोंदूबाबानं संपूर्ण कुटुंबाला आपल्या कचाट्यात ओढलं. आणि होमहवनाच्या नावाखाली घरातल्या सर्वांच्या अंगावरचे दागिनेही घेतले.  


४० दिवसांनंतर ते तुम्हाला परत केले जातील असंही या भोंदूबाबानं सांगितलं मात्र आज वर्ष उलटलं तरी या कुटुंबाला हे दागिने काही परत मिळालेले नाहीत. 


वर्षानंतरही आपलं सोने परत न मिळाल्याने शेवटी या पीडित कुटुंबानं पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात भोंदू बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय.  



रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात या भोंदूबाबाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. लवकरात लवकर या भोंदूबाबाला अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे.