जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-जळगाव या तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी तरसोद, नशिराबाद, असोदा गावातल्या संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी, शेतकरी गेल्या चार दिवसांपासून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करत आहेत. तरसोद, नशिराबाद, असोदा या गावातील शेतक-यांची बागायती शेतजमीन रेल्वेच्या विस्तारीकरणाच्या कामात जाणार आहे.


 माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी या शेतक-यांची भेट देऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. या शेतक-यांना हेक्टरी फक्त पाच ते आठ लाख रुपये इतका अल्प मोबदला मिळतोय. याच परिसरात सुरत-नागपूर महामार्ग चौपदरीकरणासाठी शेतक-यांना तब्बल दोन कोटी ऐंशी लाख रुपये हेक्टर इतका प्रचंड मोबदला दिला जातोय.