सांगली, कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापुरातल्या २२३ गावांना महापुराचा फटका बसला आहे. आतापर्यंत पुराचे २७ बळी गेले आहेत. कोल्हापूर शहरात हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. ७० हजार जणांचं स्थलांतर करण्यात आले आहे. तर महापुरामुळे एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ६७ हजार हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच सांगलीतही भीषण परिस्थिती आहे. पुराचे पाणी ओसरताना दिसत नाही. तर पूर्वेला टिळक चौक आणि पश्चिमेला सांगलीवाडी इथेही पाणी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, सांगलीत आयुर्विन पुलाजवळ कृष्णेची पाचळी ५७.५ फूट इतकी झालीय. ६५ टक्के सांगली शहर पाण्याथाली आहे. अनेक उपनगरांत, मुख्य बाजारपेठा पाण्याखाली आहेत. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प आहे. सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारणची आणखी ३ पथके, राज्य आपत्ती निवारणची २ पथकांना पाचारण करण्यात आले आहे.


एनडीआरएफच्या प्रत्येक टीममध्ये ४ बोटी व २५ जवान असून एसडीआरएफच्या पथकात प्रत्येकी २ बोटी व २८ जवान आहेत. याशिवाय महाबळेश्वर येथून ५ बोटी तर करमाळ्यावरून ५ बोटी मागविण्यात आल्या आहेत. जवळपास १ लाख १९ हजार १७६ नागरिकांचं तर २५ हजार २६० जनावरांचं पुनर्वसन करण्यात आले आहे. 
 
कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे तब्बल ६७ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अन्य पिकांबरोबरच उसालाही धोका निर्माण होऊ शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेय. तर माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी पूरग्रस्त भागात राज्य आणि केंद्र सरकारनं तातडीनं कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केलीये. पीकाबरोबरच मातीही वाहून गेल्यामुळे नुकसान अधिक होणार असल्याचं ते म्हणाले.