मुंबई : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौथ्या स्तरावरील निर्बंध ( fourth level restrictions) कायम लागू आहेत. (Coronavirus in  Ratnagiri and Sindhudurg districts) केवळ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने उघडी राहणार आहेत. तर शनिवार आणि रविवारी लॉकडाऊन कायम राहणार आहे. येथील कोरोना (Coronavirus) बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. राज्यात कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोरोना वाढीचा रेट जास्त आहे. त्यामुळे येथे निर्बंध कडक करण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात कोविड रुग्णसंख्येत (Coronavirus) घट झाल्याने 'ब्रेक द चेन' अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमधील निर्बंध रद्द झाले होते. आता जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, अहमदनगर, जळगाव, वाशिम सह इतर 13 जिल्ह्यांत  निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. जनजीवन सुरळीत सुरू होत आहे. निर्बंध किती ठेवायचे याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. रुग्णसंख्या अधिक असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या सहा जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत.


 रत्नागिरी  जिल्ह्यात चौथ्या स्तरावरील निर्बंध कायम लागू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीकुमार मित्रा यांनी दिली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौथ्या स्तरावरील निर्बंध कायम लागू आहेत. तसा आदेश  जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जारी केला आहे. 


कोरोनाबाधित रुग्णांची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने दुपारी दोन वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्याच्या अनुषंगाने आदेश देण्यात आले आहेत. या दोन्ही जिल्ह्यात मेडिकल दुकाने, आरोग्य विषयक सेवा व आरोग्य विषयक आस्थापना पूर्णवेळ सुरु राहतील. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे दुकान, आस्थापना दुपारी दोननंतर पूर्णतः बंद राहतील. दूध आणि किराणा मालाची दुकाने यांना केवळ घरपोच सेवा सकाळी 7 ते 2 या वेळेत पुरवता येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौथ्या स्तरावरील निर्बंध लागूअसा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जारी केला आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट 12 टक्के असून, ऑक्सिजन बेड्सची टक्केवारी 52 टक्के आहे.


रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा अन्य जिल्ह्यातून प्रवेश करण्यास किंवा अन्य जिल्ह्यात प्रवास करण्यास बंदी कायम आहेत. तथापि, केवळ नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी वैद्यकिय उपचारासाठी आणि कोविड-19 व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक सेवा किंवा निकडीच्या आणीबाणीच्या प्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करण्यास किंवा रत्नागिरी जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात प्रवास करणेस मुभा देण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस 48 तास अगोदर केलेली कोविड-19 निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र सोबत असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, असे जिल्ह्याधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.