पुणे : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे दिंडी किंवा पालखी प्रयाणासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  येथे दिली. कोरोना विषाणूचा फैलावर होत असल्याने आषाढी वारीसाठी दिंडी किंवा पालखी सोहळा आयोजनावर बंधन असणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने पूर्वपरवानगीची अट ठेवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त  डॉ.दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सदस्य सचिव सल्लागार विठ्ठल जोशी, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील, राजाभाऊ चोपदार, योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, संतोष मोरे, सोपानदेव देवस्थानचे विश्वस्त तथा अध्यक्ष गोपाळ गोसावी, मनोज रणवरे, श्रीकांत गोसावी आदी उपस्थित होते.


 राज्याच्या विविध भागातून आषाढी वारीसाठी दिंड्या निघतात, दिंडी किंवा पालखी प्रयाण करत असतात. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी मंडळी सहभागी होत असतात. राज्यात कोरोना विषाणूचा वाढता फैलाव लक्षात घेता लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली  आहे. तसेच दिंडी आणि पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो. यासाठी दिंडी किंवा पालखी प्रयाणासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे, शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय दिंडी, पालखी पंढरपूरकडे प्रयाण करता येणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.