परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सोमवारी संध्याकाळी दमदार पावसानं हजेरी लावली. परभणीत संध्याकाळी पाच वाजल्यापासून वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची धांदल उडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पावसामुले मात्र शहरातल्या नालेसफाईची चांगलीच पोलखोल झाली. प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि अर्धवट नालेसफाई यांमुळे वसमत रोडवर अनेक दुकानात पाणी शिरलं. महामार्गावर पाणी साचल्यामुळे काही वेळ वाहतुकीचेही तीन तेरा वाजले.  शहरात मध्यभागी असणारे सगळे महत्वाचे रस्ते पाण्याखाली गेले होते.  जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस पडत होता. हिंगोली जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे शेतातील सोयाबीनच मोठं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


दरम्यान, आजपासून (मंगळवार, १० ऑक्टो.) पुढचे चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात पावसाची दमदार हजेरी पहायला मिळण्याची शक्यता आहे. या आधीही हवामान खात्याने असाच इशारा देताना ५ ऑक्टोबरपासून १५ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याने येत्या ४ दिवसातच हा पाऊस महाराष्ट्रात बरसू शकतो असे म्हटले आहे.


परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे त्याचा शेतीसाठी फायदाच होणार आहे. कारण अद्यापही राज्यातील अनेक भागात पावसाने पाठच फिरवल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी मात्र पावसाने दमदार हजेरी लावल्याने परिसरातील धरणे ओसंडून वाहात आहेत. काही वाहन्याच्या मार्गावर आहेत. तर, दुसऱ्या बाजूला पावासाचा कहर पहायला मिळत आहे. अनेक ठिकामी वीज कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर, काही ठिकाणी इमारती कोसळणे, इमारतींचे छप्पर उडणे, झाडे उन्मळणे असे प्रकार घडले आहेत. या पावसाचा मुक्या जनावरांनाही त्रास झाला आहे. तर, अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.