नागपूर : नागपूरच्या ग्रामीण भागात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीच्या नशिबाचा फैसला होणार आहे. वाघिणीला ठार मारण्याच्या वन विभागाच्या निर्णयाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या वन्यजीव प्रेमींच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वन विभागाने न्यायालयाचे अंतिम आदेश येईपर्यंत वाघिणीला फक्त बेशुद्ध करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले. या याचिकेवर न्यायालय आपला निकाल देणार आहे. सुमारे २ वर्षाच्या या वाघिणीने गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील काटोल-नरखेड भागात दहशत माजवली होती. 


गावक-यांच्या मनातील भीती बघता तिला मारण्याचे आदेश वन विभागाने दिले होते. त्याकरता वन विभागाने एका प्रशिक्षित व्यक्तीला देखील पाचारण केले होते. 


केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी मात्र वाघिणीला ठार मारण्याचा विरोध करत तिला बेशुद्ध करण्याकरता एका तज्ञाला नागपूरला पाठवले होते. नागपुरातील काही वन्यजीव प्रेमींनी वाघिणीला ठार मारण्याच्या वन विभागाच्या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. 


या याचिकेवर न्यायालय निकाल देणार आहे. त्यानंतरच वाघिणीचे काय करायचे याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे या संबंधाने आदेश देताना न्यायालय वन विभागाची बाजू घेते की वन्यजीव प्रेमींची याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.