कोल्हापूर : कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि मेहुण्याची हत्या केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राशिवडेमध्ये इथे ही घटना घडली. ग्रामपंचायत कार्यलयाजवळच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही हत्या का केली याची अधिक माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, हत्या करण्यात आलेली महिला ही ग्रामपंचायत सदस्य असल्याचे सांगितले जात आहे. ही हत्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्यात आली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राशिवडे (ता. राधानगरी) ग्रामपंचायतच्या माजी सदस्य आणि तिच्या भावाचा कौटुंबिक वादातून हत्या करण्यात आली. आज सकाळच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोर ही घटना घडली. याप्रकरणी सदाशिव खानू कावणेकर (५२) याला राशिवडे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


मंजाबाई कावणेकर(४५), तिचा भाऊ केरबा हिवराप्पा येडगे(४०, कोथळी, ता. करवीर) अशी मृतांची नावे आहेत. हल्लेखोर सदाशिव यांने सुपारी कातरणार्‍या अडकित्याने हा हल्ला केला. जखमींना नातेवाईकांनी उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात आणले. मात्र उपचारादरम्यान दोघाचा मृत्यू झाला. 


पोलिसांना एकाच वेळी दोघांचा खून झाल्याची माहिती मिळाली. अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीरचे पोलीस उपाधीक्षक डॉ.प्रशांत अमृतकर, पोलीस उपाधीक्षक प्रेरणा कट्टे, पोलीस निरीक्षक अनिल कदम, पोलीस निरीक्षक अनिल गुजर आपल्या सहकाऱ्यासह सीपीआरमध्ये त्वरीत दाखल झाले. त्यांनी या घटनेची मृतांच्या नातेवाईकांच्याकडून माहिती घेतली. अधिक तपास  पोलीस करत आहेत. दरम्यान, ही हत्या का करण्यात आली, त्याची अधिक माहिती मिळू शकलेली नाही.