Omkar Pawar Success Story: केंद्रीय लोकसेवा आयोगानं घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेत (UPSC) साताऱ्याच्या ओंकार पवार यांनी यश मिळवलं. नागरी सेवा परिक्षेत 194 वा क्रमांक पटकवत ओंकार पवार (IAS Omkar Pawar) यांनी महाराष्ट्राची मान गर्वाने उंचावली आहे. अशातच काही दिवसांपूर्वी ओंकार पवार साताऱ्यात सनपाने (Satara) या मुळगावी शेती करताना दिसले होते. त्यानंतर आता त्यांची सक्सेस स्टोरी (Success Story) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


ओंकार पवार म्हणतात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी जेव्हा स्पर्धा परीक्षा करायचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या आईला का कुणास ठाऊक पण मी BDO (गट विकास अधिकारी) व्हावं असं वाटतं होतं. तिला त्यांच काम काय असतं याची पण काही कल्पना नव्हती. त्याचं झालं असं होतं की 1994 साली आमच्या घरच्यांनी दुसऱ्याचं शेती करायला घेतली होती. तो व्यक्ती BDO होता. तिनं बघितलेलं ते सर्वात उच्च सरकारी अधिकारी होते. त्या काळात त्यांचा रुबाब बघून सगळेच हरखून जायचे. 


माझी आई पण त्याला अपवाद नव्हती. ग्रामीण भागात लोकांना सरकारी नोकरी म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. म्हणून मग ज्या दिवशी माझा IAS चा निकाल लागला तेव्हा मी आईला हेच सांगितले की हे BDO सारखंच काम असतं. आमची बागायती शेती आहे. मग बऱ्याच वेळा आई भाजीपाला घेऊन पाचगणीच्या बाजारामध्ये भाजी विक्रीसाठी जायची. 


कोणत्याही बाजाराची एक सिस्टिम असते. त्यात विक्रेत्यांच्या जागा फिक्स असतात. पण माझी आई कधीतरी बाजाराला जायची त्यामुळे जागेवरून खूप वाद व्हायचे. पाचगणी नगरपरिषदचे कर्मचारी पण जागेवरून खूप त्रास द्यायचे. जेव्हा मी यूपीएससीचा अभ्यास चालू केला तेव्हा तिनं विचार करून ठेवलेला की मी पास झालो की तिला माझ्या सरकारीपदाच्या जोरावर एक फिक्स जागा मिळवून देईल आणि मग तिच्याशी वाद घालायची कुणाची हिम्मत होणार नाही.


माझी आजी आज 81 वर्षाची आहे. तिने शाळेची पायरी पण चढली नाही. आजीचा मी सगळ्यात लाडका आहे. तिला असं कायम वाटतं की मी तिच्या जवळच राहावं. मी दूर गेलो की तिला टेन्शन येतं. आमचे बऱ्यापैकी नातेवाईक मुंबईमध्ये असल्याने मुंबईत तिला सेक्यूर वाटायचं, असंही ओंकार पवार सांगतात.


जेव्हा मी यूपीएससी इंटरव्ह्यूला जायचो तेव्हा आजीला हे सांगून जायचो की दिल्ली जास्त लांब नाहीये, फक्त मुंबईच्या पुढं आहे. त्यामुळे मी लांब जातच नाहीये. पास झाल्यावर पण हेच सांगितलं की कामाच ठिकाण हे मुंबईच आहे. तिच्या पुण्याईने असेल कदाचित की मला महाराष्ट्र केडरच मिळालं, अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या.


माझे आजोबा हे आयुष्य भर माथाडी कामगार होते. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी हमालीचं काम सुरू केलं. त्यांनी एका अशा कालखंडात मुंबई बघितली की तेव्हा मुंबई बदलत होती. नव्वदीच्या दशकात तेव्हा गुन्हेगारी जगत त्यांनी जवळून पाहिलंय. त्याचाच परिणाम की काय म्हणून जेव्हा मी मसुरीला ट्रेनिंगसाठी येत होतो, तेव्हा त्यांनी जवळ बोलावून एक सल्ला दिला. प्रवासात कुणी अनोळखी व्यक्तीने दिलेलं चॉकलेट अजिबात खाऊ नकोस. त्यात गुंगीचं औषध असू शकतं, असा किस्सा ओंकार पवार सांगतात.


आणखी वाचा - MSRTC Employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत मोठी बातमी


दरम्यान, गावातली लोक साधी भोळी असतात. माझ्या प्रवासात गावकऱ्यांनी मला खूप मदत केली. माझा जन्म शहरात झाला असता तर कदाचित या गोष्टी मला अनुभवायला मिळाल्या नसत्या. मी जे काही आहे त्यात माझ्या कुटुंबाचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांच्या शिवाय हे सगळे अशक्य होतं, असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.