INDIA Meeting In Mumbai : विरोधकांच्या इंडिया (INDIA) आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत होणा-या इंडियाच्या बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी महाविकास आघाडीनं घेतली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर मोठी जबाबदारी असणार आहे. या बैठकीचा नेमका अजेंडा काय असेल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


मुंबईत INDIAची वज्रमूठ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

INDIA अर्थात इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स. तब्बल २६ राजकीय पक्षांनी मिळून बनवलेली विरोधकांची महाआघाडी. सत्ताधारी भाजपप्रणित एनडीएला टक्कर देण्यासाठी विरोधकांची एकवटलेली वज्रमूठ आहे. या इंडिया आघाडीची तिसरी बैठक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत होणार आहे. या बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर असणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेससोबतच शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्रितपणे या तिस-या बैठकीचं आयोजन करणार आहेत.


सत्ता नसलेल्या राज्यात इंडिया आघाडीची पहिली बैठक 


या भाजपविरोधी आघाडीची पहिली बैठक 23 जून रोजी पाटणामध्ये झाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आयोजक होते. आघाडीची दुसरी बैठक 17 आणि 18 जुलैला बंगळुरूत झाली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बैठकीचं आयोजन केलं. या बैठकीला तब्बल 26 राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. याच बैठकीत या आघाडीचं इंडिया असं नामकरण झालं. आता पहिल्यांदाच सत्ता नसलेल्या राज्यात इंडिया आघाडीची बैठक होत आहे. 


मुंबईतील बैठकीचा अजेंडा काय?


या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचं सूत्र निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नेमण्यात येणा-या 11 जणांच्या समन्वय समितीतली नावं ठरणार असल्याचं समजते. त्याशिवाय विरोधी आघाडीचं संयोजक नेमका कोण, याचाही निर्णय अपेक्षित आहे. अनेक राज्यांमध्ये विरोधी आघाडीतील घटकपक्षांची आपापसातच स्पर्धा आहे. केरळमध्ये काँग्रेस विरुद्ध डावे, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल विरुद्ध काँग्रेस विरुद्ध डावे, पंजाब आणि दिल्लीमध्ये काँग्रेस विरुद्ध आप, उत्तर प्रदेशात काँग्रेस विरुद्ध समाजवादी पार्टी, जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी विरुद्ध नॅशनल कॉन्फरन्स अशी राजकीय लढाई आहे त्यामुळं घटकपक्षांमधील मतभेद दूर करण्यासाठी मुंबईतल्या बैठकीत रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे


बंगळुरूत ज्यादिवशी विरोधी इंडिया आघाडीची बैठक झाली, त्याचदिवशी दिल्लीत भाजपप्रणित एनडीएनं देखील शक्तिप्रदर्शन केले.  अलिकडंच पंतप्रधानांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीची तुलना ईस्ट इंडिया कंपनी आणि इंडियन मुजाहिद्दीनशी केली. त्यामुळं आता भाजपचा मुकाबला करण्यासाठी मुंबईत होणा-या बैठकीत विरोधक काय रणनीती आखतात, याकडं सगळ्यांचं लक्ष असणार आहे.