कल्याण : पत्नीला सासूने भडकवल्यामुळे ती आपल्याला सोडून गेल्याचा समज करत एका जावयाने सासूला धडा शिकवण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला. कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यात या व्यक्तीच्या पहिल्या पत्नीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पण पोलिसांनी या बनावट अपहरणाचा पर्दाफाश केला. याप्रकरणी संदीप गायकवाड आणि त्याचे साथीदार जावेद खान, आकाश अभंग आणि अवी पाटील यांना अटक करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
कल्याण पूर्व भागातील तीसगाव नाका परिसरात संदीप गायकवाड हा आपल्या दोन पत्नीसह रहातो. संदीपचं अपहरण झाल्याची तक्रार संदीपच्या पहिल्या पत्नीने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला मात्र त्याचे खरंच अपहरण झाले का याबाबत पोलिसांना देखील संशय होता. त्या दृष्टीने कोळशेवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी दोन पथकं या गुन्ह्याची उकल करण्यासाठी नेमली. 


पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीने पोलीस देखील चक्रावले. संदीपची दुसरी पत्नी काही कारणामुळे सोडून निघून गेली होती. आपली पत्नी सासूमुळेच आपल्याला सोडून निघून गेल्याचा संशय संदीपला होता. त्यामुळे सासू बद्दलचा संताप आणि पत्नीचा विरह यामुळे संदीपने स्वतःचाच अपहरण करत सासूला धडा शिकवायचा आणि पत्नीकडून सहानुभूती मिळवायची असा प्लान आखला.


त्याचे मित्र जावेद खान, आकाश अभंग आणि अवी पाटील यांनी त्याला यात साथ दिली. दरम्यान आठवडाभराच्या तपासानंतर हा अपहरणाचा बनाव असल्याचा उघड झाला. याप्रकरणी पोलिसांनी संदीप गायकवाडसह त्याच्या मित्रांनाही ताब्यात घेतलं आहे.