आतिष भोईर, कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवलीत भागात कोरोना रूग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. अनलॉक चार सुरू झाल्यापासून पुन्हा कल्याण-डोंबिवलीत लक्षणीय रूग्ण वाढ होत आहे. गणपती विसर्जनपासून दररोज पाचशे हून अधिक रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण असले तरी नागरिकांचाच बेजबाबदारपणा याला कारणीभूत ठरत आहे. 


अजूनही रस्त्यावर फिरताना मास्कन लावणे, मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी करणे आदी कारणामुळेच कोरोनाची संख्या वाढत चालली आहे. गेल्या वीस दिवसात तब्बल 9549 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 130 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासन नागरिकांना सतत आवाहन करत आहे. मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. तर कंटेनमेंट झोनमध्ये परत एकदा बॅरिकेट लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत.