पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मिलिंद एकबोटेंना आणखी एक दिलासा मिळालाय. जामिनावर बाहेर असलेल्या एकबोटे यांना यापुढच्या काळात पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे जाहीर कार्यक्रम तसंच माध्यमांशी बोलण्याबाबत घालण्यात आलेले निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. पुणे सत्र न्यायालयानं हे आदेश दिले आहेत. अटकेनंतर काही अटींवर त्यांना जामीन मंजूर झाला होता. त्या अटी आता न्यायालयांनं रद्द केल्या आहेत. मात्र तपासासाठी म्हणून एकबोटे यांना पोलीस सांगतील तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावं लागणार आहे.


कोरेगाव - भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी मोठा हिंसाचार उसळला होता. या दंगली भडकावण्यासाठी मिलिंद एकबोटे जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल होता. त्यानंतर, कोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मिलिंद एकबोटे यांना हिंसाचार आणि जाळपोळीच्या आरोपाखाली १४ मार्च २०१८ मध्ये अटक करण्यात आली. परंतु, १९ एप्रिल २०१८ रोजी त्यांना २५ हजारांच्या जातमुचलक्यावर पुणे सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला होता. जामिनावेळी त्यांच्यावर जे निर्बंध घालण्यात आले होते तेही आता मागे घेण्यात आलेत.