मुंबई : राज्यात प्लास्टिक बंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला आजपासून सुरूवात झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्याच दिवशी प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली असून, पहिल्याच दिवशी ५२ जणांविरोधात कारवाई करत २ लाख ६० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. उल्हासनगरमध्येही महानगरपालिकेनं प्लास्टिक बंदीच्या कारवाईला जोरदार सुरवात केलीय. महानगरपालिकेने सर्व प्रथम प्लास्टिक पिशव्या बनवणाऱ्या कारखाने आणि इतर वस्तूच्या कंपन्यांवर कारवाईला सुरूवात केली आहे. आतापर्यंत २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक विरोधात धडक कारवाई सुरु करण्यात आली. महानगरपालिकेच्या विशेष दस्त्याने शहरातील मुख्य बाजार असलेल्या गोलबाजारात धाड टाकून अनेक दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त केले. या वेळी अनेक दुकानदार आणि मनपाच्या अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली. मात्र मनपाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करत अनेक दुकानदारांना दंड ठोठावला. 


ठाण्यात 95000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. नाशिकमध्ये 72 जणांवर कारवाई करत पहिल्याच दिवशी 3 लाख 60 हजारांचा दंड महापालिकेच्या विशेष पथकाने वसूल केला आहे.