देशात वाढत चालेल्या महागाई आणि बेरोजगारीविरुद्ध देशभरातील डाव्या पक्षांनी २५-३१ मे दरम्यान देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन महाराष्ट्रात जोरदारपणे यशस्वी करा अशी हाक राज्यातील डाव्या पक्षांनी दिली आहे. राज्यस्तरीय ऑनलाईन पार पडलेल्या बैठकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाणा पक्ष आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्तिक  बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

 

२५ ते ३१ मे दरम्यान राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयावर जनतेच्या वतीने उग्र मोर्चे आणि निदर्शने करत केंद्रातील भाजपच्या जनताविरोधी, कॉर्पोरेटधार्जिण्या आणि धर्मांधतेला उत्तेजन देणाऱ्या धोरणाचा निषेध करावा, असे आवाहन या बैठकीत डाव्या पक्षांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

 

बैठकीचे 'माकप'चे डॉ. अशोक ढवळे, 'भाकप'चे प्रकाश रेड्डी, 'शेकाप' चे राजू कोरडे तसेच इतर अन्य पक्षाचे कार्यकर्ते उपस्थितीत होते. या आंदोलनात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, जन आंदोलनांची संघर्ष समिती, इत्यादी संघटनाही सहभागी होणार आहेत.