सोलापूर : निवडणूक ऐन रंगात आली असताना काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. शनिवारी सकाळी सोलापुरात बालाजी सरोवर हॉटेलमध्ये या दोन नेत्यांची भेट झाली. सोलापूरमधल्या बालाजी सरोवर हॉटेल इथं प्रकाश आंबेडक थांबले होते. या दरम्यान आंबेडकर थाबलेल्या हॉटेलवर काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर ही थांबले होते. त्यांना भेटण्यासाठी शिंदे हॉटेल बालाजी सरोवरामध्ये आले. याठिकाणी प्रकाश आंबेडकर असल्याचं कळल्यानंतर शिंदेंनी त्यांची त्यांचीदेखील भेट घेतली. 
  
उल्लेखनीय म्हणजे, राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केल्यानंतरही पक्षाच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीतील लढाईसाठी उभे राहिलेल्या सुशील कुमार शिंदेंपुढे प्रकाश आंबेडकरांमुळे मोठी समस्या निर्माण झालीय. २०१४ सालीही लोकसभा निवडणुकीत ७८ वर्षीय सुशील कुमार शिंदे यांना जवळपास दीड लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे, प्रकाश आंबेडकर यांनी अकोला मतदार संघासोबतच सोलापूर मतदार संघातूनही आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. प्रकाश आंबेडकर यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या 'एआयएमआयएम'सोबत हातमिळवणी करत महाराष्ट्र काँग्रेसला धक्का दिलाय. सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण आणि पंढरपूर या विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. 



काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना टक्कर देण्यासाठी भाजपनं जयसिद्धेश्वर स्वामी यांनी मैदानात उतरवलं आहे.


खरं म्हणजे, भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्याच लोकसभा निवडणुकीत सोलापूरच्या नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले उमेदवार म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईमधून निवडणूक लढली आणि इथे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता जवळपास ६७ वर्षांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.