हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर :  अष्टविनायकांपैकी रांजणगावचा गणपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची वढूमधली समाधी... कोरेगाव भीमाचा विजयस्तंभ... असा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली शिरुरची भूमी. 2008 साली झालेल्या पुनर्रचनेनंतर जन्माला आलेला हा पुणे जिल्ह्यातला लोकसभा मतदारसंघ (Shirur Loksabha Constituency). सुरूवातीला शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिरूरचं राजकीय गणित
2009 मध्ये शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांनी (Shivajirao Adhalrao Patil) राष्ट्रवादीच्या विलास लांडेंचा पावणे दोन लाखांनी पराभव केला. 2014 मध्ये पुन्हा एकदा आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीच्या देवदत्त निकमांना तब्बल 3 लाखांनी पराभवाचं पाणी पाजलं. मात्र 2019 मध्ये राष्ट्रवादीनं टीव्हीच्या पडद्यावर छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारे ख्यातनाम अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) उमेदवारी दिली. त्यांनी आढळरावांचा 58 हजार मतांनी पाडाव केला आणि अगदी मोदी लाटेतही शिरूरचा गड जिंकला. शिरुर लोकसभा मतदारसंघात शिरुर, खेड - आळंदी, जुन्नर, आंबेगाव, हडपसर आणि भोसरी हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात.  2019 साली भोसरीचा अपवाद वगळता 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचेच आमदार निवडून आले.


मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतही उभी फूट पडल्यानं या मतदारसंघातलं राजकीय चित्रच बदलून गेलंय. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर खासदार अमोल कोल्हे शरद पवारांसोबत कायम राहिले. महाविकास आघाडीकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जातेय. तर शिवसेना शिंदे गटात असलेले आढळराव पाटीलही महायुतीच्या वतीनं गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्यांना उमेदवारी देण्याच्या हालचालीही सुरू झाल्यात.


अजित पवार वि. अमोल कोल्हे
गेल्यावेळी कोल्हेंना निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी (Ajit Pawar) रान उठवलं होतं. आता कोल्हेंना चीतपट करण्यासाठी स्वतः अजित पवार दंड थोपटून उभे ठाकलेत. त्यांच्यासाठी मतं मागितली ही माझी चूक झाली, पण ती चूक आम्ही सुधारु असं अजित पवार यांनी म्हटलंय. अमोल कोल्हेंसाठी मत मागितली, नंतर कोल्हे दोन वर्षानी राजिनामा देतो म्हटले, माझ्या व्यवसायावर परिणाम झाल्याने राजिनामा देतो म्हटले होते. खरंच राजकारण हा कोल्हेंचा पिंडच नाही. सेलिब्रीटींना तिकिट देतो यात आमच्या हि चुका आहेत, पण त्यांच्या डोक्यात काय असत हे आम्हाला हि माहित नसतं अशी टीका अजित पवार यांनी केलीय.


उद्याच्या लोकसभा निवडणूकीत कोल्हे म्हणतील आता मी काम करतो, पण परत चुक करू नका, मतदार संघात नाटकांचे शो करत आहेत, आता देशाची हवा मोदींच्या बाजूने आहे मोदी की गँरंटी, केद्र सरकारच्या विचारांचा खासदार निवडून द्या असं आवाहनही अजित पवार यांनी केलंय.


शिरुर मतदारसंघातील समस्या
शिरुर मतदारसंघातील सर्वात मोठी समस्या म्हणजे प्रचंड वाहतूक कोंडी. पुणे नगर, पुणे नाशिक महामार्गावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न अद्यापही कायम आहे. आदिवासी भागातील मुख्य पिक असलेल्या हिरड्याची बाजारपेठ इथं आहे. पण हिरडा प्रक्रिया उद्योग अद्याप सुरू झालेला नाही. पुणे नाशिक रेल्वे मार्ग अजूनही  रखडलेलाच आहे. 


कोल्हेंच्या विरोधात महायुती नेमकं कुणाला मैदानात उतरवणार, याची उत्सूकता आहे. कोल्हेंचा प्रतिस्पर्धी उमेदवार कुणीही असला तरी त्यांचा खरा सामना रंगणाराय, तो अजित पवारांशीच... कोल्हे विरुद्ध अजितदादा या लढाईत शिरूरचा गड कोण राखणार? घोडामैदान फार दूर नाही.