Loksabha Election 2024 Marathi Actor Viral Post: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात तिकीट मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. एकीकडे जागावाटपावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अगदी दिल्लीपर्यंत वाटाघाटी सुरु आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. असं असतानाच काही नेते तिकीटासाठी थेट दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. यामध्ये साताऱ्याच्या गादीवरील छत्रपती उदयनराजे भोसलेंचाही समावेश आहे. मागील तीन दिवसांपासून उदयनराजे दिल्लीत असून त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीची वेळ मिळालेली नाही. मात्र यावरुनच आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अजित पवारांसारख्या कणखर नेत्याला अमित शाहांसमोर हतबल पाहून वाईट वाटल्याचंही या अभिनेत्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.


अजित पवार आणि उदयनराजेंबद्दल पोस्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकीय घडामोडींवर उघडपणे व्यक्त होणाऱ्या कलाकारांमध्ये मराठी मालिका विश्वातील किरण माने यांचं नाव आघाडीवर आहे. नुकतीच त्यांनी अजित पवार आणि उदयनराजे भोसलेंसंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये किरण मानेंनी आता शरद पवार पाठीशी नसल्याने अजित पवारांचा रुबाब कमी झाला असल्याची टीप्पणी केली आहे. तसेच तिकीटासाठी दिल्लीत ठाण मांडून असलेल्या उदयनराजेंनीही 'वेळीच योग्य तो निर्णय घ्यावा' असा सल्ला किरण मानेंनी दिला आहे.


अजित पवार अमित शहापुढं लाचार कारण...


"माझं आजोळ बारामती. मी गेली 10-12 वर्ष अजितदादांना जवळनं बघितलंय, सातार्‍याच्या सर्किट हाऊसमध्ये कलेक्टर-कमिशनरपासन् पत्रकारांपर्यंत सगळ्यांवर बिनधास्त डाफरताना बघितलंय. कुणाची पर्वा न करता रूबाबात फिरताना बघितलंय. गुरगुरताना बघितलंय. अशा रांगड्या माणसाला अमित शहापुढं लाचार, हतबल बनून उभं राहिलेलं पाहून सुरूवातीला लै वाईट वाटलं," असं किरण मानेंनी पोस्टच्या सुरुवातीलाच म्हटलं आहे. "हळूहळू कळलं की दादांचा तो रूबाब होता कारण पाठीशी साहेब (शरद पवार) होते. आता स्वबळावर झगडायचंय. अभिषेक बच्चनला वडिलांचा वरदहस्त काढून घेऊन एकदम यवतमाळला पाठवून एकांकिकांसाठी स्ट्रगल करायला लावला तर कसं होईल? त्याला मनोज तिवारीसुद्धा हाडतुड करेल, तसं दादांचं झालंय हे कळलं. दादांविषयी आदर कमी नाही झाला पण त्यापेक्षा कीव जास्त वाटायला लागली," असं किरण मानेंनी म्हटलं आहे.


उदयनराजेंनी हुकूमशहांचे 'पपेट' होऊ नये


"जसं बारामती आजोळ, तशी माझी मायभूमी सातारा. पक्ष-फिक्ष बाजूला ठेवून आमचं सातारच्या गादीवर प्रेम. आज असं ऐकलं की आम्हा सातारकरांचे आदरस्थान श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तीन दिवस दिल्लीत आहेत कारण त्यांना अमित शहाची अपाॅईंटमेन्ट मिळत नाही! आजची भेटही रद्द झाली. उद्याची वेळ मिळालीय. हा फक्त महाराजांचा अपमान नाही, हा स्वराज्याच्या राजधानीचा अपमान आहे. एवढीच इच्छा आहे की महाराजांनी इतरांसारखे या हुकूमशहांचे 'पपेट' होऊ नये. वेळीच योग्य तो निर्णय घ्यावा," असा सल्ला किरण मानेंनी उदयनराजेंना दिला आहे.


...तर 'जय गुजरात'ची सक्ती


"मराठी माणसाचा अभिमान असणार्‍या नेत्यांना स्वाभिमान गहाण ठेवून परप्रांतीयांच्या वळचणीला जायची वेळ येणं हे मराठी मुलखासाठी घातक आहे. हे असेच चालू राहिले तर आपल्याला लवकरच 'जय गुजरात' अशी घोषणा देण्याची सक्ती आल्याशिवाय रहाणार नाही. ही अतिशयोक्ती नाही. आत्ताच मुंबईत हायकोर्टापासून अनेक ठिकाणी गुजराती बोर्ड दिमाखात झळकू लागलेले आहेत. वेळीच जागे व्हा," असं पोस्टच्या शेवटी किरण मानेंनी म्हटलं आहे.




आपल्या पोस्टचा शेवट किरण मानेंनी, 'जय महाराष्ट्र' असं म्हणत केलं आहे.