नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं जाहीर केल्या आहेत. यंदा ७ टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुका या ९ टप्प्यांमध्ये घेण्यात आल्या होत्या. ११ एप्रिल, १८ एप्रिल, २३ एप्रिल, २९ एप्रिल, ६ मे, १२ मे आणि १९ मे या ७ टप्प्यांमध्ये देशभरात निवडणुका होतील. तर २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात ७ टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असल्या तरी महाराष्ट्रात मात्र ४ टप्प्यांमध्येच मतदान होईल. महाराष्ट्रात ११ एप्रिलला ७ मतदारसंघात, १८ एप्रिलला १० मतदारसंघात, २३ एप्रिलला १४ मतदारसंघात आणि २९ एप्रिलला १७ मतदारसंघात मतदान होईल. पण शेवटच्या टप्प्यातलं म्हणजेच २९ एप्रिलला होणार असलेल्या मतदानाच्या दिवस हा सोमवार आहे.


शेवटच्या टप्प्यात २९ एप्रिलला शहरी टप्प्यात मतदान होतं आहे. २९ एप्रिल अगोदर २७ आणि २८ एप्रिलला चौथा शनिवार आणि रविवार आहे. दोन दिवस सुट्टी असल्यानं शहरी पट्ट्यातले मतदार मतदानाला जाऊ शकतात. त्याचा मतदानावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. एप्रिल महिन्यात शाळांना सुट्टी आहे. त्यामुळे शहरी भागातले अनेक नागरिक सहकुटुंब फिरायला जाण्याची दाट शक्यता आहे. सहलीला किंवा गावाला जा पण मतदानाला परत या. तुमचं एक मत इतिहास घडवेल. त्यामुळे प्रत्येकानं मतदानाचा हक्क बजवावा, असं आवाहन झी २४ तासनं केलं आहे.


महाराष्ट्रातल्या मतदानाच्या तारखा


पहिला टप्पा- ११ एप्रिल- ७ मतदारसंघ


वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम


दुसरा टप्पा- १८ एप्रिल- १० मतदारसंघ


बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर


तिसरा टप्पा- २३ एप्रिल- १४ मतदारसंघ


जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले


चौथा टप्पा- २९ एप्रिल- १७ मतदारसंघ


नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, दक्षिण मुंबई, मावळ, शिरुर, शिर्डी