येवला : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद पाहिजे की मुख्यमंत्रिपद हे त्यांनी ठरवायचं असल्याचं सूचक वक्तव्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे. विजय जल्लोषानंतर भुजबळ येवल्यात पत्रकारांशी बोलत होते. राज्यातल्या निवडणूक निकालात स्पष्ट बहुमत कोणालाच मिळालेलं नाही. त्यामुळे काहीही घडू शकतं, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून भुजबळ चौथ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेने वेगळा विचार केला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला तर भाजपला सत्तेपासून लांब राहावं लागू शकतं. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं ही काँग्रेस पक्षाची प्राथमिकता असेल, असं ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं होतं.



तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक कार्टून ट्विटरवर शेअर केलं आहे. या कार्टूनमध्ये वाघाच्या हातात कमळ आणि गळ्यात घड्याळ दाखवण्यात आलं आहे. संजय राऊतांनी हाच फोटो ट्विट करत व्यंगचित्रकाराची कमाल...बुरा न मानो दिवाली है असं कॅप्शन दिलं आहे.



विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भाजपला ५०-५० फॉर्म्युलाची आठवण करुन दिली. तसंच गरज पडली तर अमित शाह यांनी चर्चेसाठी यावं, असं सूचक विधानही त्यांनी केलं. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जसं ठरलं तसंच होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.