Maharashtra Assembly Election: राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना अनेक घडामोडी घडत आहेत. एकीकडे भाजपा वगळता इतर पक्षांनी उमेदवार यादी जाहीर केली नसल्याने उत्सुकता शिगेला असताना, दुसरीकडे नाराज असणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. यामुळेच अनेकजण पक्षांतर करण्याच्या तयारीत असताना यामध्ये समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांचाही समावेश आहे. समीर भुजबळ महाविकास आघाडीत प्रवेश कऱण्याची शक्यता आहे. त्यातच आता राष्ट्रवादीतून मोठी घडामोड समोर येत आहे. अजित पवार यांनी प्रदेशाध्य़क्ष सुनील तटकरे यांना समीर भुजबळांचा राजीनामा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांनी सुनील तटकरे यांना समीर भुजबळ यांचा राजीनामा घेण्याची सूचना केली आहे. अजित पवारांनी समीर भुजबळ यांना मुंबई अध्यक्षपदावरुन हटवण्याच्या सूचना केल्या असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


विधानसभा निवडणुकीत राज्याला पुन्हा एकदा काका-पुतण्यातील संघर्ष पाहायला मिळू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना त्यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) मोठा धक्का देऊ शकतात, अशी शक्यता आहे. समीर भुजबळ यांनी आधीच आपण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं आहे. पण महायुतीकडून संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याने समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचं समजत आहे. 


समीर भुजबळ नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. महायुतीत ही जागा शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे शिंदे गट ही जागा भुजबळांसाठी सोडण्याची शक्यता कमीच आहेत. अशा स्थितीत समीर भुजबळांसमोर अपक्ष लढण्याचा किंवा महाविकास आघाडीत प्रवेश कऱणं हे दोन पर्याय आहेत. सध्याच्या शक्यतांनुसार महायुतीकडून सुहास कांदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समीर भुजबळांनी अपक्ष किंवा महाविकास आघाडीचा पर्याय निवडला तर त्यांच्यासमोर सुहास कांदेंचं आव्हान असू शकतं.