सागर कुलकर्णी, मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील शिंदे गट यांनी एकत्र येवून राज्यात सरकार स्थापन केलं आहे. शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचीच कॅबिनेट अस्तित्वात आहे. यामुद्द्यावरुन विरोधकांकडून वारंवार मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी (20 जुलै 2022), सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्टपर्यंत शिवसेना अपात्र आमदारांच्या बाबत सुनावनी पुढे ढकलल्याने परत एकदा महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची चांगलीच चर्चा रंगली आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे मंत्रिमंडळ विस्तार थांबलेला नाही आणि या महिन्याच्या अखेरीच्या आधी कधीही मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.



एकनाथ शिंदे गटाचा या आठवड्यात विस्तार करावा असा आग्रह आहे पण याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज किंवा उद्या याबद्दल चर्चा करतील. दिल्लीतल्या भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे की या महिना अखेरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार करावा आणि पहिल्या टप्प्यातला हा मंत्रिमंडळ विस्तार तूरतास लहान असावा असं मत आहे. 


येऊ घातलेलं पावसाळी अधिवेशन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार असून त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं जवळपास दिसून येत आहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची कोणतीही तारीख अद्याप निश्चित ठरली नाही, असं मत भाजपातल्या एका वरिष्ठ नेत्यांनी नोंदवलं आहे.