Rajan Teli joins Uddhav Thackeray Shivsena: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपा (BJP) आणि नारायण राणेंना मोठा धक्का दिला आहे. नारायण राणेंचे (Narayan Rane) कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजन तेली (Rajan Teli) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी राजन तेली यांच्याप्रमाणे मोठ्या संख्येने कार्यकर्ते पक्षप्रवेश करतील असा विश्वास व्यक्त केला. तसंच दिशाभूल झाल्याने ते गेले होते असा टोलाही लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आज पाच जणांनी प्रवेश केला असून, पक्षप्रवेशाचे तीन वेगवेगळे कार्यक्रम पार पडले. राजन तेली यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, अंबादास दानवे उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "आज एकूण पाच पक्षप्रवेश झाले आहेत. रोज कोणी ना कोणीतरी चांगले कार्यकर्ते, माणसे शिवसेनेत येत आहेत. राजन तेली मूळचे आमचेच आहेत. मधल्या काळात त्यांची दिशाभूल झाली होती. आता ते स्वगृही आले आहेत. जसं राजन परत आले आहेत तसंच अनेक दिशाभूल झालेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत".


"राज्यातील राजकीय वातावरण बदललं आहे. कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं आहे," असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सावंतवाडीसाठी राजन तेलींचा उमेदवार म्हणून विचार केला जात आहे का? असं विचारलं असता ते म्हणाले, "विचार करायला हरकत नाही. त्यांच्या संघर्षाला अंतिम स्वरुप देण्यासाठी ते शिवसेनेत आले आहेत". 


"जसं अमोल किर्तीकर यांच्या इथे गोलमाल झाला तसा कोकणताही झाला असेल. पण कोकण आणि शिवसेना एकजीव आहेत. शिवसेनेपासून कोकणाला आणि कोकणापासून शिवसेनेला कोणी तोडू शकत नाही. येणारी निवडणूक हे सिद्ध करुन दाखवेल," असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 


जागावाटपावरुन काँग्रेससह मतभेद होत असल्याबद्दल विचारलं असता माहिती घेऊन बोलेन असं ते म्हणाले. "एकापेक्षा जास्त पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतात तेव्हा जागांच्या बाबतीत थोडी खेचाखेची होते. पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवं. फार मोठा तंटा झालेला नाही. पण माझ्या कानावर काही आलेलं नाही. माझ्या कानावर येईल तेव्हा त्यावर भाष्य करेन. येत्या दोन-तीन दिवसात किंवा उद्या जागावाटप संपू शकतो इतक्या अंतिम टपप्यात आला आहे". प्रत्येक पक्ष वेगळा आहे. आम्ही आजपर्यंत एकमेकांविरोधात लढलो आहोत. लोकसभेत जागe कमी होत्या. आता जास्त आहेत असंही त्यांनी सांगितलं.