Badlapur To Panvel Tunnel: बदलापूर ते पनवेल असा सव्वाचार किलोमीटर लांबीचा बोगदा बोगद्याचं काम 15 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत पूर्ण करण्यात आलं आहे. या प्रकल्पासाठी 2 वर्षांची मुदत दिली होती. मात्र, वेळेच्या आधीच बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. या बोगद्यामुळं बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बडोदा जेएनपीटी महामार्गावर बदलापूर ते पनवेल असा सव्वाचार किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्याचं काम अवघ्या 15 महिन्यांत पूर्ण करण्यात आलं असून यामुळे बदलापूर आणि नवी मुंबईला एक नवीन कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.


बडोदा जेएनपीटी महामार्गाचं काम सध्या पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू आहे. बदलापूर ते पनवेल बोगदा हा या महामार्गातला सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी बदलापूरहून तब्बल सव्वाचार किलोमीटर लांबीचा बोगदा पनवेलपर्यंत तयार करण्यात आला आहे. हा बोगदा 22 मीटर रुंद असून त्यात चार मार्गिका असणार आहेत. या बोगद्याला आतमध्ये काही ठिकाणी इंटरचेंज सुद्धा देण्यात आले आहेत. या बोगद्याच्या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित असताना प्रत्यक्षात अवघ्या 15 महिन्यातच बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. सध्या बोगद्यांच्या आतमध्ये प्लॅस्टरिंगचं काम सुरू असून त्यानंतर रस्ते आणि अन्य कामं केली जाणार आहेत


बोगद्याचे काम विहित मुदतीपेक्षा आधीच पूर्णत्वाला आल्यानं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही कौतुक केलं आहे. दरम्यान, बडोदा आणि जेएनपीटीला जोडणारा हा महामार्ग बदलापूर शहराजवळून जावा यासाठी मुरबाड विधानसभेचे भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी मोठा पाठपुरावा केला होता. या महामार्गावरील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या बोगद्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आमदार किसन कथोरे यांनी बोगद्याची पाहणी करून कामगारांचं कौतुक केलं. 


हा महामार्ग सुरू झाल्यानंतर या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात करता येणं शक्य होणार आहे. तर बदलापूर ते मुंबई हा प्रवास अटल सेतू मार्गे अवघ्या 30 ते 40 मिनिटात करता येणार आहे. नवी मुंबई विमानतळाला सुद्धा या महामार्गामुळे मोठी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या महामार्गावरून जेएनपीटी बंदराकडे मोठ्या प्रमाणात मालवाहतूक सुद्धा होणार असून त्यामुळे बदलापूर आणि आसपासच्या पट्ट्यात या महामार्गाला लागून कमर्शियल हब आणि गोदामं सुद्धा उभे राहू शकणार असून त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे बडोदा जेएनपीटी महामार्ग ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने समृद्धी आणणार आहे.