प्रशांत अंकुशराव, झी २४ तास, मुंबई : एटीएमच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वाधिक फसवणूक झाल्याची बाब रिझर्व्ह बँकेच्या एका सर्वेक्षणातून समोर आलीय. एटीएमद्वारे फसवणुकीत राजधानी दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे अरुणाचल प्रदेश, आसाम आणि त्रिपुरा या तीन राज्यांमध्ये एटीएम फसवणुकीची एकही घटना समोर आलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एटीएमला स्कीमर बसवून तर कधी मशीन फोडून ग्राहकांच्या पैशांवर चोरटे डल्ला मारतात. आतापर्यंत चोरट्यांनी अनेक ग्राहकांच्या मेहनतीचा पैसा चोरल्याच्या घटना समोर आल्यात. हे कमी होतं म्हणून की काय काही दिवसांपूर्वीच चक्क एटीएम मशीन पळवल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली होती. एटीएम चोरीच्या किंवा फसवणुकीच्या घटना आपण नेहमीच ऐकतो. मात्र यांत आता धक्कादायक बाब समोर आलीय. एटीएमद्वारे झालेल्या फसवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचं उघड झालंय. 


महाराष्ट्रात एटीएम फसवणुकीचे २३३ गुन्हे दाखल झालेत. यांत ४.८१ कोटी रुपयांची फसवणूक झालीय. एटीएमद्वारे होणाऱ्या फसवणुकीत राजधानी दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीत एटीएम फसवणुकीच्या १७९ घटना समोर आल्या असून यांत २.९० कोटी रुपयांचं नुकसान झालंय. तामिळनाडूत एटीएमद्वारे ३.६३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झालंय. 


त्यामुळे आता एटीएममधून पैसे काढताना ग्राहकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. 


- सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएममधून पैसे काढू नका


- एटीएममध्ये सीसीटीव्ही आहे की नाही याची खातरजमा करून घ्या


- तुम्ही कार्ड टाकता, त्याच्या खाली काही यंत्रणा स्कीमर लावलंय का हे तपासा


- कार्ड टाकता त्या जागी लाइट ब्लिंक होते का हे पाहा


- अकाऊंटमधून तुम्ही पैसे काढले नसतील आणि तरी तसा मेसेज आला असेल तर तातडीने कार्ड ब्लॉक करा


- पोलीस आणि बँकेत तातडीने तक्रार करा



एटीएमवर बँका सुरक्षारक्षक ठेवत नाहीत. याची जबाबदारी ते खासगी सुरक्षारक्षकांवर सोपवतात. मात्र एटीएममध्ये ठेवलेला पैसा जनतेचा आहे. चोरीला जातो तोही पैसा जनतेचा... चोरीला गेलेला पैसा विम्यातून बँकाना परत मिळतो तोही जनतेचा. म्हणजे या सगळ्यातून खिसा रिकामा होतोय, तो सर्वसमान्यांचाच. त्यामुळे आता ग्राहकांनीच अधिक सजग राहणे गरजेचं आहे.