मुंबई : Maharashtra Political Crisis:राजाच्या राजकारणात पुढील 48 तासात काहीही होऊ शकते, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट (Shiv Sena rebel group) आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊ शकतात. तसेच आज महाविकास आघाडी सरकारचा (Maha Vikas Aghadi government) पाठिंबा काढल्याचे पत्रही देऊ शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार धोक्यात येऊ शकते. तसेच राज्यपाल बहुमत ठराव सिद्ध करण्यासाठी अधिवेशन बोलावू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे गट सरकारचा पाठिंबा काढणार अशी शक्यता आहे. तसे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत आम्ही सरकारचा पाठिंबा काढल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आज राज्यपालांना एकनाथ शिंदे गट पत्र देण्याची शक्यता अधिक आहे. आजच्या दिवसात वेगवान घडामोडी घडण्याची शक्यता आहे. शिंदेंनी पत्र दिल्यास लक्ष राजभवनावर केंद्रित होणार आहे.


शिवसेना खासदारांची आता या वादात उडी


दरम्यान, शिवसेना खासदारांनी आता या वादात उडी घेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधत तणाव निवळण्याचा खासदारांचा प्रयत्न आहे. शिंदे यांच्याशी सध्या शिवसेनेच्या पाच खासदारांचा गट चर्चा करत आहे. पक्ष कोणत्याही स्थितीत फुटता कामा नये, असे श्रीकांत शिंदे यांना समजावलं जात आहे. शिंदे पितापुत्रांनी थोडी मवाळ भूमिका घ्यावी तसेच उद्धव ठाकरे यांनीही दोन पावलं मागे यावं ,अशी अपेक्षा या गटातल्या खासदारांनी व्यक्त केली आहे.