मुंबई : Maharashtra political crisis : शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. मात्र, शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना मोठा दणका देत त्यांना गटनेतेपदावरुन तात्काळ बाजुला केला. आता तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही इशारा दिला आहे. शिवसेना अटीशर्थीवंर चालत नाही, असे सांगत त्यांनी टीका केली. बंड शमवण्यासाठी शिंदे यांच्यासोबत चर्चा सुरु असल्याची माहिती राऊत यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची भूमिका समजून घेण्यासाठी काल पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि नेते रवींद्र फाटक मुंबईहून गुजरातमधील सूरत शहरात गेले होते. तिथे जवळपास अर्धा तास चर्चा केल्यानंतर नार्वेकर-फाटक माघारी निघाले. या भेटीत झालेल्या चर्चा, अटी-शर्ती, मागण्या किंवा प्रस्ताव यांचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र शिवसेना हा पक्ष अटीशर्थींवर चालत नाही, असे वक्तव्य करत शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी एकनाथ शिंदेंना मोठा इशारा दिल्याचं दिसतंय.


शिवसेनेतल्या बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे हे आज गुवाहाटीत दाखल झालेत. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना रात्रीत गुजरातहून गुवाहाटीला नेण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या भूकंपाचं केंद्र आता गुजरातमधून आसामच्या गुवाहाटीत गेले आहे. शिवसेनेच्या गुजरातमधून आमदारांना रात्री तीन वाजता सूरतहून गुवाहाटीकडे नेण्यात आलंय. आपल्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार सोबत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूही एकनाथ शिंदे यांच्यासह आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईही एकनाथ शिंदे यांच्यासह दाखल झाले आहेत. 


आपला वेगळा गट हीच शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. स्वतःचा वेगळा गट स्थापन करण्याची एकनाथ शिंदे यांनी तयारी केलीय.  स्वतःचा वेगळा गट स्थापन करून त्याची माहिती शिंदे राज्यपालांना देणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे. आज दुपारीच हा फॅक्स पाठवला जाईल अशी शक्यता आहे. शिवसेनेनं कालच शिंदेंना गटनेतेपदावरून हटवलं आहे. आता स्वतःचा गट हाच शिवसेना असल्याचं सांगत मोठा राजकीय भूकंप घडवण्याची शिंदे यांची तयारी आहे.