Maharashtra Rain : अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भातील शेतीचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय. लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) उद्गीरच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलीये. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. तर तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय वडेट्टीवारांचं ट्विट
एकिकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाहणी दौरा करत असताना दुसरीकडे भाजपाच्या एका आमदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार संदीप धुर्वे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. या व्हिडिओत आमदार संदीप धुर्वे (Sandip Prabhakar Dhurve) हे लावणी कलाकार गौतमी पाटीलबरोबर  (Gautami Patil) नाचताना दिसत आहे. विजय वडेट्टीवार यांनी या व्हिडिओसोबत एक पोस्टही शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय '  भाजपचे आमदार म्हणजे ‘एक ना धड भाराभर चिंध्या'


यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले.  अशी भयानक स्थिती जिल्ह्यात असताना अडचणीत असलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटील यांच्यासोबत बेभान नाचण्यात व्यस्त आहे. झोपी गेलेले मुख्यमंत्री, श्रेय लाटण्यात व्यस्त असलेले दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणे सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे काय करताय? 


जनाची नाही तर कमीत कमी मनाची लाज ठेवून तरी संकटसमयी लोकांच्या - शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जायला हवे होते.  आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? महायुती सरकार जितकं असंवेदनशील तितकेच त्यातील आमदार उथळ आहे. भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना सत्तेच्या पैश्यातून आलेली ही मस्ती आणि हा बेभानपणा दोन महिन्यात जनता नक्की उतरवणार आहे'



पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान
मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय. 11 लाख 67 हजार हेक्टरवरील पिक पाण्याखाली गेलंय. शेतीचे सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झालंय. नांदेडमध्ये 3.34 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. तर 12 जण पुराच्या पाण्यात वाहून गेलेत. त्यापाठोपाठ परभणी 2 लाख 87 हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालंय.. तर हिंगोलीत 2 लाख 58 हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेलीये.  धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात सर्वात कमी नुकसान झालंय.


दरम्यान, अतिवृष्टीमुळे विदर्भ, मराठवाड्यात शेतीचं मोठं नुकसान झालंय. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारकडे शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी केलीये. गणपतीच्या सणात शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीये..