Maharashtra Weather Latest Update  : मंगळवारी राज्यातील बहुतांश भागांमध्ये (Unseasonal Rain) अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि यात शेकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. राज्यातील काही भागांना गारपीटीचा तडाखा बसला, तर कुठे ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडाटामध्ये पावसाच्या सरी बरसल्या. एकाएकी झालेल्या या (Mumbai weather) हवामान बदलामुळं नागरिकांनाही बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान राज्यावर अवकाळीटचं सावट असतानाच इथं मुंबईच्या दिशेनंही काळे ढग आले, पण काही तासांतच हे चित्रही बदललं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत सोमवारी काही मिनिटं पावसाची रिमझिम झाली आणि त्यानंतर पुन्हा सूर्यदेवानं दर्शन दिलं. दिवस पुढे गेला तसतसं शहरातील तापमानात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार मुंबईत तापामानानं 39 अंशाचा आकडा ओलांडला असून, देशातील हे सर्वात उच्चांकी तापमान ठरलं. 



पुढील 5 दिवस काय असेल हवामानाची परिस्थिती? 


हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 5 दिवसांमध्ये हवामानात फारसे बदल अपेक्षित नाहीत. मध्य भारत, महाराष्ट्रासह गुजरातमध्येही कमाल तापमानात मोठ्या फरकानं वाढ अपेक्षित नाही. असं असलं तरीही देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीमध्ये पर्जन्यसदृश्य परिस्थिती पाहायला मिळेल. तर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या भागांमध्ये कमाल तापमान 31 ते 35 अंशांदरम्यान असेल. तिथं पश्चिम भारतात म्हणजेच कोकण, गुजरात, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ नोंदवली जाऊ शकते.  


देशभरात पावसाची हजेरी 


आयएमडीच्या माहितीनुसार येत्या 24 तासांत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील बहुतांश भागांत मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. तर, 9 आणि 10 मार्चला ओडिशा, पश्चिम बंगाल आणि गंगा नदीकाठी असणाऱ्या मैदानी क्षेत्रांमध्येही असंच चित्र पाहायला मिळेल. 11 ते 13 मार्चपासून देशातील तापमानात काही बदलांची नोंद केली जाईल. मुंबई शहर आणि परिसरात दिवसभरात ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहून काही भागांमध्ये वीजांचा कडकडाटही पाहायला मिळेल. 


हेसुद्धा वाचा : Mumbai News : उद्या मुंबईतील 'या' भागांमध्ये पाणीकपात; पुढील दोन दिवस हीच परिस्थिती 


 


दरम्यान, पश्चिमी झंझावाताचा हिमालयीन भागावर असणारा प्रभाव अद्यापही कायम आहे. त्यातच दक्षिण राजस्थान आणि नजीकच्या परिसरात चक्रीय स्थितीची तीव्रताही कायम आहे. ज्यामुळं राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट आणखी दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता आहे.