Maharashtra Weather Forecast Updates : जवळपास पाच ते सहा दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं धुमाकूळ घातल्यामुळं मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. पण, बळीराजा मात्र सुखावला. कोकणासह विदर्भात मागील काही दिवसांच्या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आल्याचं पाहायला मिळालं. हाच पाऊस पुढील काही दिवसांसाठी सुरुच राहणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार बुधवारपासून रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबईसह नाशिक आणि सातारा या भागांमध्ये पावसाचा ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे. शिवाय पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागांना पाऊस झोडपणार आहे. सध्याच्या घडीला राजच्या अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावलेली असताना पांडुरंगाच्या पंढरीत मात्र हा वरुणराजा बरसलेला नाही. त्यामुळं आता आषाढीचा योग साधत तरी त्यानं हजेरी लावाली अशीच आस वारकरी लावून आहेत.   


पुणे वेधशाळेचे महासंचालक के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार 'गेल्या काही दिवसात चांगला पाऊस झाला असला तरी, अजूनही अनेक जिल्ह्यांत पाऊस सरासरी पेक्षा खूप कमी आहे. IMD च्या अंदाज नुसार राज्यात येत्या काही दिवस पाउस सक्रिय राहील.' होसाळीकर यांच्या ट्विटमधून समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील आठ जिल्ह्यांना अद्यापही पावसानं सुखावलेलं नाही ही बाब लक्षात घेण्याजोगी.


हेसुद्धा वाचा : Photos: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठलाची महापूजा! शिंदेंनीच सांगितलं विठूरायाकडे काय मागितलं


मुंबईतल्या भायखळ्यात झाड पडून तरुणाचा मृत्यू


इथे मुंबईत पावसानं उसंत घेतली नसल्यामुळं वाहतुक कोंडीसोबतच इतरही काही समस्यांचा सामना नागरीकांना करावा लागत आहे. सततच्या पावसामुळं शहरातील काही भागांमध्ये मोठमोठी झाडं उन्मळून पडल्याचं पाहायला मिळालं. भायखळा येथे झाड पडल्यामुळं एकाचा मृत्यू तर, सहा जण गंभीररित्या जखमी झाल्याचं पाहायला मिळालं. 


 



दरम्यान, मागील दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पासवाचा फटका मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतुकीला बसला असून महामार्गवर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यामुळं जवळरपास 10  किलोमीटरपर्यत दुतर्फा वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या. 


ही वाहतूक कोंडी बरेच तास जैसे थे होती. महामार्गावर सहसा अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे किंवा महामार्गावर रस्त्याचं काम सुरू असल्यामुळं वाहतूक कोंडी होतेच. पण, पावसानं मात्र त्यात आणखी भर घातली.