मुंबई: एप्रिलच्या सुरुवातीला मे महिन्याच्या कडक उन्हाचे तीव्र चटके राज्यातील नागरिकांना बसत आहेत. महिन्याच्या सुरुवातीलाच काही जिल्ह्यांमध्ये तापमानानं चाळीशी गाठली आहे. घामाच्या धारा आणि उकाड्यानं नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. आताची ही परिस्थिती आहे तर अजून मे महिना जाणं बाकी आहे. त्यामुळे येत्या काळात हिट वेव येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोल्यात 42.1 तर परभणी जिल्ह्यात 41.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल नागपूर आणि गोंदियाचा क्रमांक आहे. नागपुरात 40.2 अंश सेल्सियस तर गोंदियामध्ये 40 अंशावर तापमान पोहोचलं आहे. 



चंद्रपुरात 42 तर ब्रह्मपुरी इथे 41.3 अंश सेल्सियसवर तापमान पोहोचलं आहे. अमरावतीमध्ये देखील तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. एकीकडे वाढणारं कोरोनाचं संकट आणि दुसरीकडे वाढणारा उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.


दिवसेंदिवस उकाडा जास्त वाढत असल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यायला हवी. अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ इथे यलो अलर्ट जारी कऱण्यात आला आहे. या आठवड्यात या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त तापमान राहिल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.