मनमाड : मनमाड  शहराचा पाणी प्रश्न इतका गंभीर झाला आहे की आता चक्क साठवून ठेवलेल्या पाण्याची चोरी होण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहे.मनमाडच्या  श्रावस्ती नगर भागात एका नागरिकाने घराच्या छतावर  साठवून ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून 300 लिटर पाणी चोरी झाल्याची तक्रार पोलिसात देण्यात आल्यानंतर  खळबळ  उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनमाड शहराचा पाणी अत्यंत बिकट असून गेल्या चार दशकांपासून मनमाडकर तीव्र पाणी टंचाईचा सामना करतात . अत्यल्प पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे वाघदर्डी  धरण कोरडेठाक आहे तर  पालखेडच्या आवर्तनावर  मनमाडच्या पाण्याची भिस्त आहे . पालिकेकडून  महिन्यातुन एकादाच पाणी पुरवठा केला जातो .त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा करतात  मनमाडच्या  श्रावस्ती नगर भागात राहणाऱ्या  विलास आहिरे यांनीही आपल्या घरावर  पाचशे लिटरच्या पाण्याच्या टाक्या भरून ठेवल्या होत्या त्यापैकी एका टाकीतून  अज्ञात चोरट्यांनी  चक्क 300 लिटर   पाणी चोरून  नेले . त्यामुळे  आहिरे यांच्या कुटुंबाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार दिली.  पाणी चोंरांना  शोधण्याचे  मोठे आव्हान  . तर दुसरीकडे पाणी चोरी झाल्याने  पुढच्या काळात ;आहिरे  परिवारावर  पाण्याची शोधाशोध करण्यकची वेळ आली आहे .  


मनमाडच्या पाणी टंचाईच्या इतिहासात प्रथमच  पाणीचोरीची घटना सामोर आल्याने  मनमाडची पाणी टंचाई किती गंभीर आहे याचा विचार केलेला बरा. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी मनमाडचा पाणीप्रश्न सुटू  शकला नाही. माजी उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तरी मनमाडचा पाणीप्रश्न सुटेल अशी मनमाडकरांना अपेक्षा होती.त्यामुळे भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ यांना  मनमाडच्या जनतेने  दोनदा संधी दिली मात्र  तात्पुरती मलमपट्टी करण्यापलीकडे  भुजबळही मनमाडचा पाणीप्रश्न मार्गी लावू शकले नाही त्यामुळे मनमाडकरांचा  भ्रमनिरास झाला.आता तर  भीषण पाणी टंचाईमुळे  पाणी चोरी होऊ लागल्याने  मनमाडच्या  नागरिकांनी  चांगलाच धसका घेतला असून  साठवून ठेवलेले पाण्याच्या राखण करण्याची वेळ  नागरिकांवर आली आहे. 



मनमाडला पाणी चोरीसारख्या घटना  घडत असल्याने  पुढील   काळात  मनमाड शहरात पाण्यावरून मोठ्या  कलह निर्माण होण्याचे संकेत मिळत आहे . पाण्यासाठी  मनमाडकर गेल्या कित्येक वर्षांपासून आर्त  हाक देत आहे . मात्र  त्याकडे ना  लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे  ना  शासकीय अधिकाऱ्यांचे .मनमाडकराच्या घश्याची  तहान  भागवून मनमाडच्या पाणी प्रश्न कायमचा कधी सुटेल असा  प्रश्न विचारला जात आहे.