Maratha Reservation: विधान परिषद निवडणुकीत ओबीसी उमेदवाराला मत देणाऱ्या मराठा नेत्यांना आम्ही पाडणार असा इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली आयोजीत करण्यात आली होती. हजारो मराठा आंदोलक सहभागी झाले होते. त्यांना संबोधित करताना मनोज जरांगे यांनी हा इशारा दिला आहे. यावेली त्यांनी 20 जुलैपासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचंही जाहीर केलं आहे. 


मराठा आमदारांना जाहीर इशारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठ्यांच्या आमदारांचं मत घेऊन, मराठ्याच्या दारात जाऊन डीजे वाजवून शिव्या दिल्या तर मी तो त्रास सहन करणार नाही. त्यामुळे ज्या मराठा आमदारांनी मतदान केलं आहे, त्यांनी त्या ओबीसी नेत्यांना नीट सांगायचं अशी तंबीच मनोज जरांगे यांनी दिली आहे. तसंच मराठ्याचं मतदान घेऊन जे विधान परिषदेवर आमदार झाले आहेत त्यांनी त्रास दिला, तर ज्या मराठ्याच्या आमदाराने त्याला मतदान केलं त्याला पहिलं पाडणार असा इशाराही त्यांनी दिला आहे. विधानपरिषदेच्या कोणत्या आमदाराला कोणत्या मराठा आमदाराने मतदान केलं त्याची यादी 9 वाजता येणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली. 
 
"जर मराठा आमदाराच्या मतावर निवडून आला, आणि मराठ्यांच्या गोरगरिबाला ओबीसी नेता त्रास देणार असला तर मतदान करणारा मराठ्याचा आमदारच पाडून टाकायचा. तू मतदान केलं म्हणून ते आमच्या मागे लागले. विधान परिषदेत मराठ्यांच्या मतावर निवडून आलेल्या ओबीसी नेत्याला हा संदेश आहे. तुमचं मराठ्य़ाशिवाय जमत नाही, कशाला विरोध करता. कशाला आमच्या नादी लागता," असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. 


20 जुलैला आमरण उपोषण


आज रात्रीत निर्णय झाला नाही तर 20 तारखेला अंतरवालीत आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार. 20 तारखेला विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार निवडुन द्यायचे की पाडायचे याचा निर्णय घेणार. जर निर्णय घेतला नाही तर मुंबईलाही जाणार आणि 288 उमेदवार देखील पाडणार. 20 तारखेला राज्यातील मराठ्यांच्या बैठकीची तारीख जाहीर करणार तसंच मुंबईला कधी जायचं याचा निर्णय देखील 20 तारखेला घेणार अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.