मुंबई : Maratha Reservation: MP Sambhaji Raje's letter to CM : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) खासदार संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje) अधिक आक्रमक झाले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अद्याप मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आपण 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. तसेच याबाबत ट्विटही केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रात 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण बसणार असल्याचे नमुद केले आहे. आपण 5 मे 2021 रोजी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाचे शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाकडे समाजाच्यावतीने आम्ही काही मागण्या केल्या होत्या. 17 जून 2021 रोजी आपल्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत आपण या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र, आज आठ महिने उलटले तरी या मागण्यांबाबत पुढे काहीही झालेले नाही, असे संभाजीराजे म्हणाले.


मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत कोणतीही प्रशासकीय कार्यवाही झालेली दिसत नाही. यामुळे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी या मागण्यांची ठोस अंमलबजावणी होईपर्यंत 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदान, मुंबई येथे आपण आमरण उपोषणास बसणार आहे, असे ते म्हणाले.  



सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार आरक्षणाला स्थगिती देण्याआधी शासकीय सेवेत ज्या उमेदवारांची निवड प्रक्रिया झालेली आहे, त्यांना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात. सरकार दरबारी गोंधळ असल्याने महावितरण आणि MPSC मार्फत निवड झालेले विद्यार्थी न्याय मिळण्यासाठी झगडत आहेत. सरकार EWS मध्ये नियुक्ती देण्याचे सांगत असून ते अशक्य आहे. त्यामुळे ESBC, SEBC व EWS मध्ये वाद निर्माण होईल. यावर तोडगा काढण्याची मागणीही केली आहे.


सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी 1000 कोटी रुपयांचा निधी मागितला असता तो निधी एकदम न देता सारथीच्या विकासाचा आराखडा तयार करून त्याप्रमाणे राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करून आवश्यक तितका निधी वेळोवेळी सारथी संस्थेला वर्ग करू, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापही तसा कोणताही आराखडा तयार करण्यात आलेला नाही. आदी मागण्यापूर्ण तडीस नेण्यासाठी संभाजीराजे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.