मुंबई : सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाच्या मुद्याला स्थगिती देण्याल आल्यानंतर हा मुद्दा चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी आंदोलनं सुरु झाली. राजकीय वर्तुळात वजन प्राप्त असणाऱ्या मंडळींनी यात उडी घेतली आणि आरक्षणाच्या मागणीसाठी आळवण्यात येणारा सूर अधिक तीव्र झाल्याचं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरक्षणाच्या मुद्द्यानं जोर धरला असतानाच काही नेतेमंडळींकडून वापरण्यात आलेली भाषा पाहता, हीच बाब शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनाच्या अग्रलेखात अधोरेखित करत जिभेची तलवारबाजी जनता फार काळ सहन करेल अशी स्थिती नसल्याची बाब मांडत टोला लगावला. 


जातीय आरक्षणासाठी तलवारी उपसण्याची भाषा सुरु आहे. अशी भाषा करणारी मंडळी तालेवार आहेत, असं म्हणत आता शमीच्या झाडावर असणारी शस्त्र नेमकी कोण काढणार आणि ती कोणावर चालवली जाणार याकडेच साऱ्यांचं लक्ष असेल, असं शिवसेनाकडून म्हणत आरक्षणासाठी चर्चेत असणाऱ्या दोन्ही राजांवर अग्रलेखातून निशाणा साधला गेला आहे. 


राज्यातील एकंदर परिस्थिती, जनतेवर असणारा आर्थिक बोजा पाहता आता जनता जिभेची तलवारबाजी सहन करणार नाही, हा मुद्दा शिवसेनेकडून अधोरेखित करण्यात आला. राज्याचे प्रश्न वेगळे आहेत असं म्हणत अग्रलेखातून कोरोना काळात उदभवलेलं आर्थिक संकट आणि त्यामुळ सर्वसामान्यांवर ओढावलेल्या हलाखीच्या परिस्थितीची काही उदाहरणं देत या प्रश्नांवर बोलण्यास कोणीही तयार नसल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली. 


 


मराठा आरक्षणाला स्थगिती मिळताच उदयनराजे आणि संभाजी राजे आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. त्यातच एमपीएससी परीक्षा पुढं ढकलल्या नाहीत तर, वेळ आल्यास तलवारी काढू असं इशारावजा वक्तव्यंही यादरम्यान करण्यात आलं होतं. त्याचाच समाचार सामना अग्रलेखातून घेण्यात आला.