मुंबई: भारतीय जनता पक्षाशी असलेली युती तोडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. मात्र आता पुन्हा भाजपशी जुळवून घ्या अशी साद शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घातली आहे. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही विनंती केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तेत असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपले कार्यकर्ते फोडत आहेत. यामुळे पक्ष कमकुवत होत आहे, अशा आशयाचं पत्र प्रताप सरनाईक यांनी लिहिलं आहे. शिवाय या पत्रात पंतप्रधान मोदींशी जुळवून घेतलेलंच बरं असंही सरनाईक यांनी म्हटलं आहे.


प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांनी लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "सध्याच्या परिस्थितीतही जे राजकारण सुरु आहे त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेलं बरं, असं वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे."


"आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबियांवर सुध्दा सतत आघात होत आहेत, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणं, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणं, अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल," असंही सरनाईक यांनी पत्रात नमूद केलं आहे.