राज्यातील फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नाही असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना लगावला आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निशाणी काढून घेणं लोकांना आवडलेलं नाही. मी याबाबत अमित शाह यांना कल्पना दिली होती असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी ही विधानं केली आहेत. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण आता विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. 


राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनुष्यबाण आणि शिवसेना ही बाळासाहेबांची ओळख आहे. बाळासाहेबांना कमी लेखू नका. शिवसेना, धनुष्यबाण निशाणी काढून घेणं लोकांना आवडलेलं नाही. अमित शाह यांना मी याबाबत कल्पना दिली होती असा खुलासा राज ठाकरेंनी पदाधिकारी मेळाव्यात केला. तसंच राज्यातील फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नाही. मोदी नको म्हणून काहींनी महाविकास आघाडीला मत दिलं आहे असंही त्यांनी सांगितलं. 


"विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी आहे. राज्यात स्वबळावर 225 ते 250 जागा लढणार," असंही राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं. जुलै महिन्यात राज्याचा दौरा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. 


तसंच या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान हे मराठी माणसाचं नसल्याचंही म्हटल्याचं समजतं. "मराठी माणूस आपण कधी रिंगणात उतरतोय याची वाट पाहतोय," असं म्हणत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जनता मनसेची वाट पाहत असल्याचं म्हटलं. त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी लोकांच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल राग असल्याचं राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. 


राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली होती. राज यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभाही घेतल्या होत्या. मात्र आता जागा वाटपामध्ये राज यांच्या वाट्याला कमी जागा येतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या सत्तेत असलेल्या भाजपाचे 105 आमदार आहेत. शिंदे गटाचे 40 तर अजित पवार गटाचेही तितकेच आमदार असल्याने जागा वाटपामध्ये राज ठाकरेंच्या वाट्याला फारच कमी जागा येतील असा अंदाज बांदला जात असल्याने राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसे स्वबळावर निवडणूक लढवण्याचा मार्ग चाचपडून पाहत असल्याचे समजते.