Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग प्रश्नावर मनसेने (MNS) आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचं (Mumbai-Goa Highway) साम्राज्य पसरलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पनवेलमध्ये महामार्गाची पाहाणी केली त्यानंतर पनवेलमधील कार्यक्रमामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना आंदोलन सुरु करण्याचं आव्हान केलं. असं आंदोलन करा की भविष्यात कोणालाही असे खराब रस्ते बनवताना आपल्या आंदोलनाची,  भीती वाटली पाहिजे असे आदेश राज ठाकरे यांनी दिले. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. माणगावमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड  केली.  मुंबई गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात मनसे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड आणि कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. मनसे कार्यकर्त्यांनी माणगाव इथलं चेतक सन्नी कंपनीत कार्यालय फोडलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पनवेलमध्ये राज ठाकरे यांच्या मेळाव्यावरुन परतताना मनसे कार्यकर्त्यांनी माणगावमध्ये तोडफोड सुरु केली. कार्यालयातील खूर्च्या आणि फर्निचरची तोडफोड करत कार्यकर्त्यांनी मनसेच्या घोषणा दिल्या. या घटनेनंतर कार्यालयाबाहेर पोलस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुढच्या काही दिवात महागार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असा इशाराच मनसेने दिला आहे. 


खड्डयावरुन टोला
चांद्रयान चंद्रावर जाऊन काय उपयोग, त्याठिकाणी जाऊन खड्डेच बघायचे आहेत, त्यापेक्षा महाराष्ट्रात सोडलं असतं तर खर्चही वाचला असता असा खोचक टोला राज ठाकरेंनी लगावलाय.  राज ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांची पाहणी केली. पनवेलजवळ त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. खड्ड्यांवरुन पदाधिकाऱ्यांना आंदोलनाचे आदेशही देण्यात आलेत.  


दरम्यान, पनवेलमधल्या मेळाव्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजप आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. रस्त्यांची दुरवस्था आणि राजकीय परिस्थिती यावरुन राज यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपनं दुसऱ्याचे आमदार न फोडता पक्ष उभारायला शिकावं, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.. राष्ट्रवादीवर टीका करताना राज यांनी अजित पवारांची मिमिक्रीही केली. कोकणात जमिनीचे पट्टेच्या पट्टे विकत कोण घेतलंय? बारसुत पाच पाच हजार एकर जमिन कुणी विकत घेतली? आपल्याच लोकांना कोण फसवतंय.. असे सवाल उपस्थित करत त्यांनी कोकणातल्या जमिन खरेदी-विक्रीच्या मुद्द्यावरही बोट ठेवलं.


मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार?
मुंबई-गोवा महामार्गाचं काम गेल्या चौदा वर्षाहून रखडलंय.  अनेकवेळा आश्वासनं देऊनही रस्त्याचे काम मार्गी लागताना दिसत नाही. त्यातच  गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी भरमसाठ खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि कोकणातील प्रवाशांचे हाल होत आहेत.