रत्नागिरी : राजापूर नाणार रिफायनरी विरोधातील आंदोलन आणखी चिघळले आहे. कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांची प्रकृती नीट नसतानाही पोलिसांनी जबरदस्तीनं गाडीत कोंबून त्यांना न्यायालयात नेले. 


वालम रुग्णालयात दाखल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी काल वालम यांना अटक केली होती. तेव्हापासून ते रुग्णालयात दाखल होते. मात्र पोलिसांनी दडपशाही करून त्यांना न्यायालयात नेलं. त्यामुळं त्यांची प्रकृती खालावल्याचा आरोप वालम यांच्या पत्नी अश्विनी यांनी केलाय. यामुळे त्यांच्या अटकेनंतर वाद अधिक चिघळलाय.


वालम यांना का केली अटक?


अध्यक्ष अशोक वालम यांना पत्नीसह अटक त्यांच्या पडवे येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. नाटे पोलिसांनी ही अटक केलीय. मनाई असताना सभा घेतली म्हणून जमावबंदीचं उल्लंघन आणि मारहाण असे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेत. त्यामुळे राजापुरात तणावाचं वातावरण आहे.


अटकेमागे काय आहे कारण?


नाणार रिफायनरी प्रल्कल्पविरोधी बैठकीत एका व्यक्तीला ग्रामस्थांकडून चोप देण्यात आला आहे. कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समिती मुंबई यांनी राजापूरच्या कुंभवडे हायस्कूलमध्ये ही बैठक आयोजीत केली होती. दरम्यान चोप मिळालेला व्यक्ती दलाल असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केलाय. यावेळी त्या व्यक्तीविरुद्ध दादागिरीचा प्रयत्न करण्यात आला असाही आरोप करण्यात येतोय. दादागिरी केल्यामुळे कुंभवडे येथील महिलांनी या व्यक्तीला मारहाण केलीय अशीही माहिती मिळतेय.